(संदर्भ: महाभारत ही एक तोंडोतोंडी चालत आलेली कथा / कविता आहे आणि म्हणून वेद व्यासांनी जसे ते लिहिले तसेच्या तसे आपल्यापर्यंत पोहोचले नाही. त्याची अपभ्रंशित (निकृष्ट - लोवर ग्रेड) प्रत आपल्यापर्यंत पोहोचली. बी. आर. चोप्रा महाभारताने त्यात भर घातली.
उदाहरणार्थ:
१. कर्णाला सतत सूतपुत्र म्हणून ज्यानी-त्यानी हिणवणे पण व्यास महाभारतात तसे नाही
२. युधिष्ठिराला निर्णय न घेणारा आणि कमजोर दाखवले पण व्यास महाभारतात तर तो नायक आहे आणि कृष्ण हा महानायक आहे
३. द्रौपदीला खूप तापट स्वभावाची आणि मनात येईल ते ताबडतोब बोलणारी दाखवली आहे पण व्यास महाभारतात तसे नाही
४ एकलव्यावरील चुकीची माहिती
वगैरे वगैरे.
ह्या सर्व्ह त्रुटींना सुधारत व्यासांनी ही व्यक्तिचित्रे कशी रंगवली होती हे दर्शवणारी खालील कविता)
कवितेतल्या कवितेला, समजायचे आहे
नाही शब्दार्थ, भावार्थ समजायचे आहे || १ ||
वाटली जड गीता, वाचली उथळ वरवर
न येति पाळता, वचने फार बडबड || २ ||
वाचली परत एकचित्त, अर्थगर्भ अथांग
निर्मळ स्थिर पाणी, खोलात खोल || ३ ||
पाहिले महाभारत, सांगितले दुसऱ्यांनी
म्हणावयाचे व्यासांना काय, बघ पडताळूनि || ४ ||
अर्जुन पुत्र अभिमन्यू, अभिमन्यू पुत्र परीक्षित
परीक्षित पुत्र जन्मेजय, राजयज्ञ करीत || ५ ||
जन्मेजय यज्ञी, दाखवे उत्सुकता
जाणुनी घेण्या, पूर्वज इतिहासा || ६ ||
वैशम्पायन, वेद व्यास आज्ञा
सांगे यज्ञी, महाभारत कथा || ७ ||
नंतर उग्रश्रवा सौती, आपुल्या शिष्या
सांगती, महाभारत कथा || ८ ||
(संदर्भ: अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, अभिमन्यू पुत्र परीक्षित, परीक्षित पुत्र जन्मेजय ह्याच्या एका यज्ञात आपले पूर्वज कसे होते हे जाणून घेण्याची इच्छा जाहीर करतो आणि मग वेद व्यासांच्या आज्ञेवरून, वैशंपायन ऋषी त्या यज्ञात महाभारत कथा सांगतात. तिथे उग्रश्रवा सौती साधू उपस्थित होते आणि नंतर ते ही कथा त्यांच्या शिष्यांना सांगतात. सौती म्हणजे सूत. ते स्वतः सूत होते आणि त्यांनी ही कथा प्रचलित केली.
त्या काळात सुताला कमी लेखत नसत ह्याचा हा पुरावा. सूत हा युद्धात निपुण शिवाय सारथी पण असायचा म्हणून त्याचा मान होता. स्वतः कृष्ण नंतर अर्जुनाचा सारथी (सूत) बनला. अज्ञातवासात पांडव जिथे राहिले त्या विराट राजाने सूत पुत्रीशी विवाह केला होता आणि किचक हा त्याचा सेनापती सुद्धा सूत होता. हे सर्व पाहता सूतपुत्र म्हणून कर्णाला कोणी हिणवले असे व्यास महाभारतात नाही.)
द्रोण न नकारी, अधिरथपुत्र कर्णास शिष्य
द्रोण न अवमानी, राज्यबांधिल गुरुकर्तव्य || ९ ||
द्रोण न देई, कोणासी ब्रह्मास्त्रविद्या
द्रोण न माने, पात्र ती कोणी घेण्या || १० ||
अश्वत्थामा पाठपुरावा, शिकविले ब्रह्मास्त्र चालवण्या
अपात्र ठरला, परत त्याला घेण्या || ११ ||
ब्राह्मण पिता शुद्र माता, शुद्र पिता क्षत्रिय माता
पुत्र ह्यांचा, निषाद जात || १२ ||
निषाद करिती शिकार, बनविती शस्त्र
सत्यवती होती निषाद, मासेमारी व्यवसाय || १३ ||
द्रोणांनी नाकारला शिष्य एकलव्य, निषादराज पुत्र
जात पात कारण नाही, शिष्य फक्त राजपुत्र || १४ ||
वडील मृत्यूनंतर, एकलव्य झाला निषादराज
उपहार देई युधिष्ठिरा, राजसूय यज्ञ || १५ ||
निषादराज जरासंध संधी, आक्रमण द्वारिकेवरी जरासंध वधानंतरी
कृष्ण वधे एकलव्य, युद्धप्रसंगी || १६ ||
(संदर्भ: द्रोणाचार्य हे राजगुरू होते म्हणजे ते राजपरिवारातील लोकांना शिक्षा देण्यास बांधील होते. शिवाय ते राजाचे सल्लागार देखील होते. ह्या सर्व व्यापात ते व्यस्त होते. त्यांनी कर्णाला सुध्दा शिकविले. तो राजघराण्यातील सार्थ्याचा (अधिरथ पुत्र - अधिरथ हा धृतराष्ट्रासाठी काम करत होता) मुलगा होता. ते त्याला नाकारू शकत नव्हते. परंतु त्यांनी कोणालाच ब्रह्मास्त्र विद्या शिकविली नाही. अश्वथ्थाम्याने खूप पाठपुरावा करून आपल्या वडिलांकडून (द्रोणांकडून) जबरदस्तीने ब्रह्मास्त्र कसे चालवायचे ह्याची विद्या अर्जित केली पण वापस कसे मागवायचे हे शिकूच शकला नाही. म्हणूनच कर्ण नंतर परशुरामांकडे ब्रह्मास्त्र विद्या शिकण्यासाठी गेला. परशुरामांनी त्याला शाप वगैरे काही दिला नाही. युद्ध प्रसंगी कर्णावर युद्ध जिंकण्याचा खूप तणाव होता आणि त्या तणावात तो ब्रह्मास्त्र चालवण्याची विद्या विसरला एवढेच. अर्जुनाने नंतर अनेक दिव्यास्त्रे मिळवली. ती द्रोणाचार्यांनी दिली नव्हती.
एकलव्याला द्रोणाचार्यांनी शिष्य बनवले नाही कारण ते राजघराण्याशी बांधील होते आणि त्यांचा व्याप खूप होता. एकलव्य हा निषाद समुदायाचा होता आणि त्याचे वडील ह्या समुदायाचे राजा होते. म्हणजे तो निषादराजाचा पुत्र होता. शस्त्रास्त बनवण्यात, शिकार कलेत निपुण होता. कुत्र्याच्या तोंडात अनेक बाण सापडले ते ह्याच शिकारी कलेमुळे. वडिलांच्या मृत्यूनंतर तो स्वतः राजा बनला. युधिष्ठिराच्या पहिल्या राजसूय यज्ञात तो उपस्थित होता. त्याची आणि निषाद समुदायाची जरासंधाशी संधी होती. जरासंध वधानंतर जे जरासंध सेनेचे यादव (कृष्ण) सेनेशी युद्ध झाले त्यात तो मारला गेला.)
सुमनस्व तेजस्वी द्रौपदी, न वदे 'सुतं न वरयामी'
न भेदू शकला स्वयंवरलक्ष्य कर्ण, मत्स्य लोचनी || १७ ||
अर्जुन जिंके स्वयंवर, द्रौपदी पांडव येति कुटीस
संभ्रम फार, कोण वरे द्रौपदीस || १८ ||
करू न शके विवाह बंधू, अविवाहित राजा आणि वडीलबंधू
युधिष्ठिर मांडे प्रस्ताव, द्रौपदी वरे पाचही बंधू || १९ ||
आक्षेप न घेई द्रौपदी प्रस्तावास, कुटुंब राहील एकत्र
एकाच माळेचे मणी बनून, राहू एकत्र || २० ||
नायक महाभारताचा धर्मजाणता, युधिष्ठिर
निर्णय घेई, कठीण संगर || २१ ||
न बरळे, 'आंधळ्याचा पुत्र आंधळा'
रागावर ताबा, गुण हाच तर निराळा || २२ ||
भट्टनारायण वेणीसंभारं दाखवे दृश्य, बांधी भीम द्रौपदीकेश माखले रक्ताने हाथ
द्रौपदी वदली होती फक्त, नाही केशबांधणी दुश्श्यासन वधापर्यंत || २३ ||
(संदर्भ: भट्टनारायण ह्यांनी लिहिलेल्या वेणीसंभारं नाटकामध्ये असे दृश्य दाखवण्यात आले की भीम दुश्श्यासनाला मारून त्याच्या रक्तरंजित हातांनी द्रौपदीचे केश बांधतो. त्यातून लोकांनी असा अर्थ काढला की द्रौपदीनेच तसा प्रण घेतला होता. तिने फक्त दुश्श्यासन वधापर्यंत केश बांधणार नाही एवढेच म्हंटले होते. बाकी अपभ्रंश.
द्रौपदी स्वयंवरामध्ये माश्याचा डोळा कर्ण भेदू शकला नाही एवढेच. त्यामुळे मी सुताशी विवाह करणार नाही द्रौपदी म्हणणे अशक्य. शिवाय तो द्रुपदाच्या आमंत्रणावरून तिथे आला होता. त्या स्वयंवरात बिन आमंत्रित जनता ही आली होती आणि त्या जनतेचा भाग म्हणून पाच पांडव ब्राह्मण वेशात आले होते. जेंव्हा प्रण आमंत्रित पूर्ण करू शकले नाहीत तेंव्हा द्रुपदाने उपस्थित जनतेत कोणी असेल जो हा प्रण पूर्ण करू शकेल, समोर यावे असे आवाहन केले आणि मगच ब्राह्मण वेशातील अर्जुन पुढे गेला आणि माश्याचा डोळ्याला बाणाने भेदून स्वयंवर प्रण पूर्ण केला. जाती पाती भेद त्या काळात नव्हता हेही ह्यावरून सिद्ध होते.
त्या काळातल्या प्रथेनुसार, राजाचा सेनापती किंवा सूत राजाच्या वतीने स्वयंवरात भाग घेऊन, स्वयंवरप्रण जिंकून राजासाठी पत्नी आणू शकत होते. दुर्योधनाच्या पहिल्या पत्नीला स्वयंवरात जिंकून कर्णच घेऊन आला होता. कर्णाचा मान मोठा होता आणि त्यामुळे त्याला सूतपुत्र म्हणून कोणी हिणवू शकत नव्हते.
युद्ध जिंकल्यावर पांडवांनी अनेक वर्ष राज्य केले. द्रौपदी, युधिष्ठीर प्रस्थापित राज्याची वित्त मंत्री आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होती. ती खूप धोरणात्मक आणि संपूर्ण विचाराअंती निर्णय घेणारी होती, हे युधिष्ठिराला माहिती होते आणि म्हणूनच त्याने तिला त्या पदी नियुक्त केले होते. युधिष्ठीराने किंवा इतर चार पांडवांनी त्यांच्या बाकीच्या पत्नींना, द्रौपदी सोडता, कुठलीच राज्यपदवी दिल्याचा उल्लेख व्यास लिखित महाभारतात नाही. अशी स्त्री "आंधळ्याचा पुत्र आंधळा" असे म्हणेल असे वाटत नाही. व्यास लिखित महाभारतात तसा उल्लेख नाही.
युधिष्ठीराने प्रत्येक कठीण प्रसंगी निर्णय घेतला आहे. त्या काळात वडीलबंधू चा विवाह जर झाला नसेल तर धाकटा भाऊ लग्न करू शकत नव्हता. त्यामुळे अर्जुन प्रण जिंकून सुद्धा द्रौपदीशी लग्न करू शकत नव्हता. हा बिकट प्रसंग होता कारण युधिष्ठीर आणि भीम दोघेही अविवाहित होते. त्यावर युधिष्ठीर, द्रौपदी आपल्या सगळ्यांची पत्नी होईल असा प्रस्ताव मांडतो - सर्वेषाम भार्या भविष्यसि. द्रौपदी त्यावर आक्षेप घेत नाही हे महत्वाचं. ह्यावरून युधिष्ठीर हा ठाम मतवादी आणि निर्णय घेणारा होता हे सिद्ध होते - तो पुरोगामी विचारांचा होता. सर्वांचे हित मनात ठेवून विचार करणारा होता. तो खऱ्या अर्थी राजा होता.)
गंधर्व युद्ध होता, पांडव सोडविती दुर्योधना
शकुनी सल्ला दुर्योधना, देऊन देई इंद्रप्रस्थ त्यांना || २४ ||
(संदर्भ: शकुनी हा वाईटच असेच चित्र आपल्याला दाखवण्यात आले. व्यासांनी एका प्रसंगात असे सांगितले आहे की त्याने दुर्योधनाला, पांडवांना इंद्रप्रस्थ देऊन देण्याचा सल्ला दिला होता. इंद्रप्रस्थ हे हस्तिनापुरापेक्षा खूप छोटे होते आणि ते पांडवांना दिल्याने दुर्योधनाची लोकप्रियता वाढेल असे त्याला वाटत होते. शिवाय शकुनीलाही युद्ध नको होते. पण दुर्दैवाने, दुर्योधनाने त्याचा सल्ला मानला नाही.)
दानवीर पदवीने, भारून गेला
धर्मसंकटाच्या वेळी, स्वतःलाच मान दिला || २५ ||
आला इंद्र मागण्या, दिले कवच इंद्रास्त्र बदल्या
दोष न आपुल्या दानवीर पदवी, मैत्री लाविली पणाला || २६ ||
'गांगेय जिविती न योद्धसे', कर्ण वदला
श्रेय माझ्या सामर्थ्याचे, मिळे भीष्मा || २७ ||
जे पाहिजे स्वतःला, कर्ण तेचि वदे दुर्योधना
तेवत ठेवी युद्ध आशा, मनी दुर्योधना || २८ ||
कर्ण जीवनदान देई नकुल सहदेवा, सतराव्या दिवशी युद्धाच्या
घायाळ स्तिथीत अर्धमेल्या, सोडून देई युधिष्ठिरा || २९ ||
न मारता त्यांना, घात मित्रत्वाचा केला
स्वप्रतिज्ञा पाळण्या, विजय बळी चढवला || ३० ||
(संदर्भ: कर्ण हा शूरवीर आणि दानवीर होता हे जितके खरे तितकेच हेही खरे की त्याने "मी आहे नं अर्जुनाचा द्वंद्वी" असे दुर्योधनाच्या मनावर बिंबवून युद्ध जिंकण्याची आशा तेवत ठेवली. खरे पाहिले तर त्याला जे हवे होते तेच तो दुर्योधनाजवळ बोलून कबूल करवून घेत होता. कौरव युद्ध हारण्याचं एकमेव कारण कर्ण होता. त्याने युध्दाच्या सतराव्या दिवशी, युधिष्ठिराला घायाळ करून अर्धमेल्या परिस्थितीत सोडून दिले. शिवाय त्याने नकुल सहदेवाला असेच सोडून दिले. भीमाला तर त्याने तू माझ्याशी युद्ध करण्याच्या लायकीचा नाही असे म्हणून आपला रथ दुसऱ्या दिशेने वळवला. कारण काहीही असो. त्याने आपल्या दानवीर पदवीला धक्का पोहोचू नये म्हणून नेहमीच आपल्या मित्रत्त्वाला आणि कौरव विजयला पणावर लावले.
'गांगेय जिविती न योद्धसे' असेही तो म्हणाला होता. माझ्या वीरतेचे श्रेय, भीष्माला मिळेल असे त्याला होऊ द्यायचे नव्हते, म्हणून त्याने भीष्म सेनापती असेसपर्यंत युद्ध केले नाही. हा त्याचा स्वतःचा निर्णय होता. भीष्मांनी त्याला तसे म्हंटले नव्हते.)
कृष्णाद्ये दारूक सारथी, नेई अर्जुन द्वारिका
यादव स्त्रीरक्षण, उद्देश मोठा || ३१ ||
कृष्ण गंतव्याची बातमी, रस आटला जगण्याचा
अर्जुन वदे वसुदेवासी, निकट गंतव्य कृष्णे पांडवा || ३२ ||
एक आत्मा, सात शरीरा
जगणे दुश्वार, कृष्णविना || ३३ ||
(संदर्भ: जेंव्हा यादवी माजली, तेंव्हा कृष्णाने त्याच्या दारूक सारथ्याला अर्जुनाला घेऊन येण्याची आज्ञा दिली जेणेंकडून अर्जुन यादव स्त्रियांचे रक्षण करेल. परंतु जेंव्हा अर्जुन तेथे पोहोचला तेंव्हा कृष्ण हयात नव्हता आणि ती बातमी ऐकताच त्याचा जीवनातला रस आटला आणि त्याने त्यावेळी वसुदेवाला (कृष्णाच्या वडिलांना) सांगितले की आता द्रौपदी (कृष्णे) आणि पांडवांचे जाणे निकट आहे.
हा उल्लेख फार महत्वाचा आहे. अर्जुनाने फक्त द्रौपदीचेच नाव घेतले बाकी पत्नींचे नाही. ह्यावरून पांडवांच्या मनात द्रौपदीचे काय स्थान होते हे दिसते. शिवाय पांडवांची कृष्णाशी असलेली एकरूपताही सिद्ध होते केवळ अर्जुनाचीच नाही. अस्तु.)
अमोल पाटखेडकर
१४-डिसेंबर-२०२२
No comments:
Post a Comment