Monday, 31 October 2016

दिवाळी पाडवा

      आज दिवाळी पाडवा
     अलगद येई मनांत बाबा,
     तुमच्या आठवणींचा गोडवा

    ओवाळीत असे तुम्हाला मी या दिवशी
      शुभ कुंकुम टिळा भाळी शोभतसे
       अक्षदांच्या राशी
     आनंद पाडवा साजरा होई
      दिवाळीच्या दिवशी
   सहवासात तुमच्या सदैव चाखला मेवा
     
      आज दिवाळी पाडवा
      अलगद येई मनांत बाबा,
      तुमच्या आठवणींचा गोडवा

       'आधी खावे चणे लोखंडाचे
          मग तो ब्रह्मपदी नाचे'
   हा कष्टाचा मंत्र तुमच्याकडूनच शिकावा
    तुमच्या राज्यात पाहिले नाही मी कधी;
     अनुभवले नाही मी कधी कडक ऊन
    तुमच्या मायेच्या सावलीचे छत्र आहे
      माझ्या डोक्यावर अजून
     आज नसलात तुम्ही या दुनियेत तरी
       तुमच्या आठवणींनी आज
      क्षण अन् क्षण सोनेरी व्हावा
       आज दिवाळी पाडवा
      अलगद येई मनांत बाबा,
      तुमच्या आठवणींचा गोडवा

     नुसती परीक्षेत पास झाली तरी
     पेढे सर्वांना वाटायचे तुम्ही
      लेक माझी लाडकी म्हणून;
      कित्ती लाड करायचे तुम्ही
      कित्ती हट्ट पुरवायचे तुम्ही
     सहज चालता बोलता गप्पागोष्टीत
      जीवन मूल्ये सांगायचे तुम्ही
     छोट्या गोष्टीत कसा मिळवावा आनंद
      तो तर तुमच्याकडूनच घ्यावा
  संस्कारांच्या शिदोरीचा दिला तुम्ही, मला
    आयुष्यभर पुरुन उरेल इतका ठेवा
        आज दिवाळी पाडवा
       अलगद येई मनांत बाबा,
       तुमच्या आठवणींचा गोडवा

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

      ३१ अॉक्टोबर २०१६.

Sunday, 30 October 2016

जय लक्ष्मी माता

       जय लक्ष्मी माता
      विष्णूची प्रिय कांता
     
   कोटी कोटी दीपांनी उजळल्या ज्योती
    अंधार, अज्ञानास मात त्या देती
     तुझ्या आगमनाची वाट सर्व पाहती
   गरीब असो वा श्रीमंत, शरण तुला जाती
        जय लक्ष्मी माता
        विष्णूची प्रिय कांता

       वर्षाव कर तू समृध्दीचा
       वर्षाव  कर तू धनधान्याचा
       वर्षाव कर तू सौख्याचा
       लवलेश नको दारिद्रयाचा
       लवलेश नको भ्रष्टतेचा
       विनाश होवो अधर्माचा
        जय लक्ष्मी माता
       विष्णूची प्रिय कांता

       प्रसन्न हो तू सैनिकांना
        देश वीर जवानांना
       प्रसन्न हो तू शेतकऱ्यांना
      मातीतून मोती पिकविणा-यांना
       प्रसन्न हो तू कष्टक-यांना
       प्रसन्न हो तू चराचराला
         जय लक्ष्मी माता
        विष्णूची प्रिय कांता

       अमोल कृपा तव व्हावी आता
       अवतरित होवो आम्हांमध्ये
        तुझी विशाल दिव्यता
        मुकुंदाची मनमोहिनी तू
       सुखसमृध्दीच्या सा रे,,, नी....
        तार छेड या जीवन संगीता
          जय लक्ष्मी माता
         विष्णूची प्रिय कांता

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

      ३० अॉक्टोबर २०१६.

गोष्ट तशी गमतीची

     गोष्ट तशी गमतीची
     दिवाळीच्या दिवसांची
     लज्जत भारी फराळाची
      तृप्त खळगी पोटाची
    
      रंगीबेरंगी कपड्यांची
      रंगीबेरंगी साड्यांची
      रंगीबेरंगी शालू नि पैठण्यांची
      केसात माळलेल्या गज-यांची
    हौस भागतसे नटण्या मुरडण्याची
     
      वडील, मुलीच्या आपुलकीची
       पती, पत्नीच्या प्रेमाची
     बहीण भावाच्या जिव्हाळ्याची
     द्वितीयेच्या चन्द्र साक्षीची
    गाठभेट घडवी जीवलग नात्यांची
     सोनेरी क्षणांच्या सोबतीची
     
      आकाशदिव्यांच्या साथीची
       तिमिराकडून तेजाची
      अंतरंगातल्या उत्साहाची
       स्वच्छतेच्या प्रतीकाची
      अज्ञान, अंधःकार नाशाची

      घननिळ्याच्या सावलीची
       लक्ष्मीच्या सोनपावलांची
       ओढ तिच्या स्वागताची
       रांगोळी संस्कार भारतीची
   
       दिव्य पणत्यांच्या प्रकाशाची
      मनाला साद देणाऱ्या ज्योतींची
      घराघराला शोभा झगमगाटाची
      गरीब असो वा श्रीमंतांची
      ध्वनीप्रदूषणविरहित फटाक्यांची

        पवित्रता आणि मांगल्याची
       स्फूर्तिदायी, विवेकी विचारांची
        शिदोरी मिळे संस्कारांची
       थोरामोठ्यांच्या आशिर्वादाची
        दिव्यत्वाच्या प्रचितीची
       रात्रीच्या लखलख सौंदर्याची

       खुलते कळी फुलाफुलांची
       खुलते हास्यकळी मनामनांची
      वर्षागणिक येणाऱ्या दिवाळीची
       आनंदाच्या टिकलीची
        वेगानं उंच जाणाऱ्या
        प्रकाशाच्या झाडांची
      प्रकाश सांडणा-या फुलबाज्यांची
       धडधडणा-या लवंगीची
    आकाशात झेपावणा-या रॉकेटची
        शुभेच्छांच्या वर्षावाची
       मजा अशी ही चार दिवसांची

          गोष्ट तशी गमतीची
         दिवाळीच्या दिवसांची....
         दिवाळीच्या दिवसांची.... !!!

 मृदुला मुकुंद पाटखेडकर.

 ३० अॉक्टोबर २०१६.

Saturday, 29 October 2016

विवेकदीप

    "मी अविवेकाची काजळी
    फेडुनि विवेकदीप उजळी
   तै योगिया पाहे दिवाळी निरंतर".......
   .... संत ज्ञानेश्वर.

   हौस, मौज, आनंद, दिवाळी ही चार दिवसांची मजा असते असा आपल्या सर्वांचा समज असतो; त्यादृष्टीने सर्वजण स्वच्छता, रांगोळ्यांची सजावट, विविध स्वरुपाची आरास, पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीची सरमिसळ करुन, रंगीबेरंगी पणत्या लावून, आकाशदीप सजवून, दिव्यांची रोषणाई, तोरणफुले लावून, अत्यंत उत्साहात दिवाळीचे स्वागत करतात. ज्ञानेश्वरांनी मात्र वरील ओळींमधून उदात्त विचारांची, विवेकदीप लावणारी दिवाळी साजरी करण्यावर प्रकाश  टाकला आहे. ही विवेकाची दिवाळी कशी साजरी करावी?

   अविवेकाची काजळी सर्वदूर साचलेली आहे; मग तो पुरातन काळ असो की आजचा काळ असो. अविवेक म्हणजेच नरकासुर. दुराचारी, व्यभिचारी, भ्रष्ट आचरण कृती, फसवणूक, निष्पाप, निरागस लोकांचा सूड घेण्याची वृत्ती, कोणत्याही स्वरुपाचा अहंकार, माज, असमान वागणूक, अत्याचार, अनागोंदी, अस्वच्छता शरीराची मनाचीही; म्हणजेच अविवेक. जिथे सारासार विचार नाही तो अविवेक.

  काळ आणि युग कोणतेही असो हा  अविवेक जोपर्यन्त मनात आहे तोपर्यन्त विवेकाचा प्रवेश मनात होणे कठीणच. एखादे कळकट, मळाची काजळी चढलेले तांबा वा पितळेचे भांडे आपण जसे घासून पुसून स्वच्छ करतो, तसेच या मनातील अविवेकाच्या काजळीला स्वच्छ करावे लागते.

   आज कार्तिक कृष्ण चतुर्दशी. नरकचतुर्दशी. कथा नरकचतुर्दशीची; लहानपणीपासून रेडिओवर दरवर्षी वेगवेगळ्या किर्तनकारांच्या रसाळ वाणीतून ऐकण्याचे भाग्य मला प्राप्त झाले. आईबाबांनीही ही कथा अगदी रंगवून सांगितल्याचे आठवते. आजच्या दिवशी भल्या पहाटे उठून, उटणे आणि सुगंधी तेल लावून मंगल स्नान करतात. नवीन कपडे घालतात. घरातील थोरामोठ्यांचे आशिर्वाद घेतात. माझे बाबा भल्या पहाटे उठून आधी रेडिओवरची मंगल धून लावायचे. मोठ्या आवाजात आणि बासरीच्या सुमधुर सूरात दिवाळीची संगीतमय पहाट उजाडायची. रेडिओवर कथा ऐकता ऐकता तयारी करायची. नवीन कपडे घालून आकाशातील चन्द्र आणि रोहिणीचे दर्शन घ्यायचे आणि नंतर सुट्टी लागली म्हणून आणि सकाळी सकाळी अभ्यास चांगला लक्षात राहतो म्हणून नंतर काही पाठांतर व्हायचे.

     प्रागजोतिषपूर नगरीचा राक्षस राजा होता नरकासुर. त्याने सगळीकडे अन्याय अत्याचाराची दहशत पसरविली होती. १६००० स्त्रियांना बंदी बनविले होते. त्या सर्वजणी मुक्ती देणाऱ्या मुकुंदाची वाट पाहत होत्या. श्रीकृष्णाने आजच्याच दिवशी द्वापारयुगात भल्या पहाटे पत्नी सत्यभामा हिच्या मदतीने नरकासुराचा वध केला. म्हणून आजही आपण हा दिवस आनंदाने साजरा करतो. पण.. तरीही एक प्रश्न सोडवायचा शिल्लक राहिला; तो हा की, सर्व स्त्रिया इतके दिवस नरकासुराच्या नजरकैदेत असल्यामुळे त्यांना समाजाने स्वीकारणे अशक्य होते. कृष्णाला त्यांनी विनवणी केली की आता तूच आम्हाला मुक्ती दे. तूच आमचा उध्दार कर. द्वापारयुगातील स्त्रिया त्या!! आजच्या काळातील मुली स्त्रियांप्रमाणे सुशिक्षित प्रगत कशा असणार?? त्यांना तारणहाराची गरज होती. कृष्णाने त्यांच्याशी विवाह करुन त्यांना आजन्म संरक्षण दिले.

   हा झाला आजच्या दिवसाचे महत्त्व सांगणारा कथाभाग!! काही क्षण आपण कृष्णाला परमेश्वर मानता व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहिले तर त्याने त्याकाळी स्त्रियांना किती मान आणि सन्मान प्राप्त करुन देऊन समाजात इज्जत आणि स्थान मिळवून दिले. दिवाळी हा सण आपण प्रतीकात्मक साजरा करतो. प्रत्येक दिवसाचे  केवळ वरवर अर्थ लावले जातात. आपल्या प्रत्येक सण आणि उत्सवात असेच उदात्त अर्थ निघतात; ज्यातून आनंद तर मिळतोच पण बोधही!!!  हीच तर भारतीय संस्कृतीची महानता आहे.

    अनेक नरकासुर आजही समाजात राजरोसपणे वावरत आहेत. स्त्रियांवर आजही अत्याचार, अन्याय होत आहेत. अविवेकाचा नरकासुर ठायी ठायी माजला आहे. शुध्द विवेकी मनाचे निर्मळ तेल घालून, शांतता आणि पवित्र आचरणाच्या वाती घालून, दिवाळीच्या अनेक ज्योती मनामनात पेटवून, अविवेकाच्या काजळीला पराभूत करुन, अक्षय्य आणि रोजच अशी दिवाळी साजरी करु या. ज्ञानेश्वरांच्या वरील ओळीतील दिवाळीप्रमाणेच!!!
   शेवटी काय तर.....
   "मन शुध्द तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची
       तू चाल पुढं..... तू चाल पुढं....
      तुला रं गड्या भीती कशाची अन्
        पर्वा बी कशाची"...... !!!!

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

      २९ अॉक्टोबर २०१६.

Friday, 28 October 2016

प्रकाशपर्व

     मिट्ट असा काळोख दाट
   प्रकाशालाही काढावी लागते वाट
    
     काळोखाला आमंत्रणं नसतात
     तो येतोच आपोआप बोलावता
   प्रकाशासाठी मात्र करावी लागते खटपट

      दरी दरीतूनी, खो-या खो-यातूनी
      वाटे काळोखास जिंकलो आपण
      अज्ञानास वाटे जिंकलो आपण
       दुःखास वाटे जिंकलो आपण
       दुष्टांना वाटे जिंकलो आपण
      जिंकला काळोख म्हणता म्हणता
     पणती प्रकाश पसरे पाहता पाहता
    जिंकला मन काळोख म्हणता म्हणता
    प्रकाश पडो मनांत, उजळो मन ज्योती
     अज्ञान, दुःख, दुष्टांच्या जळो वाती
 तेजाचा लख्ख प्रकाश पडो तिमिराभोवती
   ज्ञानधन, विचारधन, आयुष्यधन आणि
    लक्ष्मी धनाचा वर्षाव होवो सर्वांवरती
   उजळो गावे, उजळो शहरे, उजळो देश, उजळो प्राणी, उजळो पक्षी, उजळो सृष्टी
      दिपांनी उजळो सारे विश्व
     भारुनी टाको वाट नि वाट
     दिपवूनी जावो दिशा नि दिशा
      मनामनांस सापडो प्रकाशवाट
      प्रकाशवाट.....प्रकाशवाट....

    मृदुला मुकुंद पाटखेडकर.

      २८अॉक्टोबर २०१६.

Thursday, 27 October 2016

गूढ प्रेमाचे

     ओळखीचे होतो कधी
     अनोळखी झालो आज
     प्रीतीच्या प्रेमळ नयनांत
      आज दुःखाश्रूंचा साज

      सांगायचे होते तुला
      मला काहीतरी
      सांगायचे होते मला
       तुला काहीतरी
       राहूनच गेले सांगायचे
       कितीही वाटून आता
       काय उपयोग आज

      तुझी जागा हृदयात माझ्या
      तुझी जागा नयनांत माझ्या
      तुझी जागा घरात माझ्या
    नाही दुसऱ्या कुणा द्यावी वाटत
      तुझ्या नी माझ्या प्रेमाचे गूढ
       नाही कुणा सांगावे वाटत
      दव पसरले तुझ्या आठवणींचे
      मन झाले व्याकूळ आज

       गुंतता हृदय हे प्रेमात
       रमून गेले मी तुझ्यात
       रमता रमता तुझ्यात
       गुंग झाले या नात्यात
        तुटता वीण तुटेना ही
        कितीही तोडली तरी
        दूर गेलो कितीही जरी
       मनात जवळ तू अजूनतरी
      उच्छ्वास सांगे श्वासाला
      मजला वारंवार आज

     मृदुला मुकुंद पाटखेडकर.

       २७ अॉक्टोबर २०१६.