Thursday, 31 January 2019

ल्यायले सुख मी


  'सुख आणि दुःख' व्यक्तींच्या रुपात personified करायचं दिग्दर्शक विराजने निश्चित केलं आणि त्याने लगेच अभिनेत्री सुरेखाला फोन लावला. नाटकासाठी काम करणा-या स्टार मंडळींना उद्या रविवारी त्याच्या घरी आमंत्रण होतं. चहा घेता-घेता विराजने सुरेखाला प्रश्न केला, 'तुला कोण व्हायला आवडेल? सुख की दुःख?' सुरेखा काहीही विचार करता पटकन उत्तरली, 'दुःख.' विराज चमकला आणि म्हणाला, 'का गं? मला वाटलं; तुला 'सुख' personified करायला आवडेल.'  त्यावर सुरेखा बोलली, 'सुख म्हणजे नक्की काय असतं? मला माहित नाही. आजवर मी त्याला खूप शोधलं पण माझ्या नशिबातच ते नाही असं दिसतं.' तिच्या या उत्तरावर विराज परत वेगळ्याच विचारात गढून गेला. भानावर आल्यावर 'ओके' म्हणत, उद्यापासून नाटकाची रिहर्सल करण्याचं ठरलं. सुरेखाच्या खाजगी आयुष्यासंबंधी विराजला सगळंच ठाऊक होतं. अत्यंत गरीब परिस्थितीतून ती आजवर इथपर्यंत पोहोचली होती. अभिनेत्री म्हणून तिचा एक खास चाहतावर्ग होता. सुरेखाच्या नव-याला मात्र तिची सततची कटकट कंटाळवाणी होऊ लागली होती. सततचे नाटकाचे प्रयोग, दौरे, शिवाय ज्या दिवशी ती घरी असायची, त्या दिवशी काही ना काहीतरी कामाची जबाबदारी आपणही पार पाडायची, अशी तिची इच्छा असे. सुरेखामध्ये गुणांची काहीच कमतरता नाही हे तिचा नवरा संजय जाणून होता; पण या तिच्या सततच्या चिडचिड्या स्वभावामुळे तिच्याच तब्येतीला धोका आहे आणि हे सुरेखाला कधी समजणार? याची तो चिंता करायचा आणि मुख्य म्हणजे हिला, आजूबाजूला विसावलेलं सुख का दिसत नाही? याच प्रश्नात तो कायम अडकून राही.

  काही दिवस झाले. नाटकाची तालीम जोरात सुरु होती; पण रोज घरी आल्यावर संजयला सुरेखा मात्र अधिकच अस्वस्थ होते, असं जाणवत होतं. रात्री कुठल्यातरी विचारात ती गुंग व्हायची, कधी मधेच झोपेतून उठायची. आधीच तिच्या चिडचिडीमुळे काळजीत असलेला संजय आता नाटकाच्या तालमीनंतर सुरेखाच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या गूढ हावभावांनी आणखीनच व्यथित होऊ लागला. अखेर संजयने नाटकाची तालीम बघायला सुरेखासोबत जायचं ठरवलं आणि परवानगीसाठी त्याने विराजला फोन लावला. ह्या नाटकाच्या गोष्टीतच काहीतरी असावं, ज्यामुळे सुरेखा अस्वस्थ होते, असा अंदाज त्याने मनाशी धरला; आणि कळेलच उद्या कारण! तालीम बघितल्यावर! असं मनांत तो पुटपुटला.

   ते नाटक म्हणजे सुखदुःखातला वादविवाद आणि भांडण होतं. 'दुःख' personify करणारी अभिनेत्री सुरेखा, 'सुख' personify करणा-या दुस-या नायिकेच्या वक्तव्यांना फोल ठरविण्याचा प्रयत्न करत होती. रिहर्सलमधील नाटकाचा शेवटचा टप्पा जसाजसा समोर येत होता, तसातसा संजयचा आशावाद बळकट होत होता; कारण या शेवटच्या काही प्रसंगातून तरी सुरेखाला सहज सुख म्हणजे काय हे नक्की कळेल याची खात्री त्याला वाटू लागली, कारण यापूर्वीच्या नाटकाच्या Break मधे भूमिकेतून बाहेर आल्यावर सुरेखा मनाने मात्र वेगळ्याच भूमिकेत शिरत होती; जणू काही सुखदुःखाचं द्वंद्व तिच्या मनांतच रुंजी घालत होतं.

 नाटकाच्या तालमीचे दिवस संपले. नाटक  प्रेक्षकांना पसंत पडू लागलं. नाटकाच्या यशानं सुरेखाला 'सुख' मिळालं होतं आणि ती सगळी प्रसन्नता तिच्या चेहऱ्यावर झळकत होती. ऐन परीक्षांचे दिवस असल्याने सुरेखाची मुलगी नाट्यप्रयोगांना येऊ शकली नाही, त्यामुळे ती आज सुरेखाच्या मागेच लागली, 'आई, सांग ना गं? असं काय विशेष होतं त्या नाटकात?' सुरेखाने मोबाईल उघडला आणि नाटकाचा video मुलीला बघायला दिला आणि म्हणाली, सुखाचे संवाद ऐक, 'अगं, मी सुख! प्रियकराने साधं गुलाबाचं फुल तुझ्यासारख्या प्रेयसीला दिले तर त्यातही मी असते! गुलाबी प्रेमाचं प्रतीक बनून! ते बघून तुझा चेहरा फुलतो आणि तू प्रसन्न होते! म्हणजेच मनाची प्रसन्नता मीच! साध्या प्रसंगी मी सहज भेटत असते गं! फक्त सुखाची वाट ज्याची त्याने शोधावी, मी भेटतेच'!
सुरेखाच्या मुलीने आणि संजयने दिग्दर्शक विराजला खूप धन्यवाद दिले; कारण हे नाटक त्याने सुरेखाच्या सुखासाठी लिहिलं होतं.

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

No comments:

Post a Comment