Friday, 25 November 2016

गंधाली

   अगणित झाडे आणि वृक्षवेली
  असंख्य रंगीबेरंगी फुले खुलली
 दवबिंदूंच्या थराने न्हाऊन निघाली
कोवळी कोवळी ऊन किरणे पसरली
 सुगंधी दरवळाची ही सृष्टी गंधाली
 सृष्टी सौंदर्य बघता नयनें सुखावली

  जमती चिमण्या, जमती कावळे
जमती राघू, जमती मैना, जमती बगळे
 पक्ष्यांच्या थव्यांनी आसमंता बहर आली
विविधरंगी आकारांनी, विविधरंगी छटांनी
  आकाशावर पसरली लाली

   निसर्गरमणीय दृश्यांनी.....
     धरणी सुखावली
  प्राजक्त बहरला, आमराई मोहरली
  जाई, जुई, चमेली, शेवंती फुलली
  सुगंधी श्वासात रजनी गंधाळली
  चन्द्र, चांदण्यांनी रात तेजाळली
 दिवस दिव्य आणि रात्र स्वर्गीय वाटली
  निसर्गाची किमया सर्वदूर दाटली

  निसर्गाची विविधता ऋतूंनी जपली
  रात्रींनी प्रभातींना आलिंगनं दिली
 फुलाफुलांवर फुलपाखरे हळूवार बागडली
  घोड्यांच्या घोडदौडीने गतिमान झाली
  हरणांच्या कळपांनी रानें आनंदली
  सर्व प्राणी, पक्ष्यांनी परिपूर्णता आली
  भरलेपणाने भरलेल्या या निसर्गाने
    धरणीला समृध्दी आणली

 निसर्गाने मानवाला सुंदर सृष्टी भेट दिली
  सृष्टिसौंदर्याने नटलेली, बहरलेली
   जणू अप्सराच अवतरली
शान राखण्या माझी शपथ का हो तुम्ही घेतली???...
विनवणी करुन कळकळीची सृष्टी देवता बोलली
    निसर्ग आहे तर मानव आहे
    निसर्ग आहे तर सौंदर्य आहे
अस्तित्वाचे महत्त्व आपुले ती पटवून गेली.

     मृदुला मुकुंद पाटखेडकर.

          २५/११/२०१६.

Saturday, 19 November 2016

झाशीची राणी

     पराक्रमी, अतुल्य शक्ती तू
      युध्दकलानिपुण तू
       झाशीची राणी तू....
       मनकर्णिका तू....
       रणरागिणी तू
     फेकला तटाहूनी घोडा तू
   
      महाराष्ट्राची कन्या तू
      'मेरी झाँसी नहीं दूंगी'
      निडरपणे सांगणारी तू
     निर्भया तू, निडर स्त्री तू
     स्त्री शक्तीची स्फूर्ती तू
     बाळ पाठीशी घेऊनी लढली
     थोर, बलशाली मर्दानी तू
     इंग्रजांशी शूरपणे झुंजणारी तू
    तळपती, लखलखती दामिनी तू
     आमच्या मनाची स्वामिनी तू
     प्रेरणादायी, स्फूर्तिदायी तू
      अबला नसून सबला तू
      कालातीत आदर्श तू
      भारताची शान तू
     स्त्री मनाचा अभिमान तू
     शौर्याचा परिपाठ तू
     वीरगतीने अमर तू
     इतिहासाचं सोनेरी पान तू
     शूरतेचं बनलीस उपमान तू
      झाशीची राणी तू.....
       मनकर्णिका तू.....
       रणरागिणी तू.....
      झाशीची राणी तू....
       रणरागिणी तू......

    मृदुला मुकुंद पाटखेडकर.

      १९ नोव्हेंबर २०१६.

काळीज

     काळीज असतं सर्वांनाच
     कधी असतं ते कठोर
     कधी असतं ते निष्ठूर
     कधी असतं मायेचं
     कधी असतं फुलांसारखं कोमल
      अलगद, हळुवार स्पर्शाचं
      कधी असतं वेदनांचं
      कधी असतं विवंचनांचं
      कधी असतं प्रतीक शुध्दतेचं

      कुणाचं काळीज असं
      कुणाचं काळीज तसं
     हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं
      कारण....ज्याचं त्यालाच ते
      लखलाभ असतं
     काळीज एकमेकांकडे जात असतं
     त्याचं तिला आणि तिचं त्याला
     येऊन अद्वैतासारखं मिळत असतं
     तेंव्हा मात्र ते -याखु-या प्रेमाची
     साक्ष देत असतं, मिसळून जात असतं

       काळीज होतं संतांचं
     दुनियेला मार्ग दाखविण्याचं
     विवेकाची पखरण करण्याचं

     काळीज होतं देशप्रेमींचं
    निःस्वार्थ देशसेवा करण्याचं
     प्राणांची आहुती देण्याचं

  काळीज होतं शिवाजीच्या मावळ्यांचं
    निधड्या छातीचा ढाण्या वाघ
   बाजीप्रभू देशपांडेचं, जीवा महालाचं
   जीवाला जीव देणाऱ्या साथीदारांचं
    महाराज गडावर पोहोचेपर्यन्त
    निष्ठेने खिंड लढविण्याचं

     काळीज होतं हनुमान सेवकाचं
     श्रीरामाच्या अखंड नामजपाचं
    दाखविता त्याने फाडून काळीज
    दिसत होतं रुपडं राम आणि सीतेचं

      काळीज होतं विवेकानंदांचं
    धर्म आणि न्यायनीतीने वागण्याचं
    देशाची संस्कृती आणि अभिमान
     अटकेपार उंचावण्याचं
     बलदंड युवक घडविण्याचं
    आत्मबल वाढविण्याचं
    भरभरुन प्रेरणा देण्याचं
    चारित्र्यसंपन्न राष्ट्र घडविण्याचं

      अस्सं काळीज सुरेख बाई
      ज्यांना ज्यांना मिळालं बाई
     अमरत्वाकडे ते घेऊन जाई
     आदर्शांच्या खुणा ठेवून जाई
      कितीही आली युगानुयुगे तरीही...
     नावलौकिक अलौकिक करुन जाई
     नावलौकिक अलौकिक करुन जाई.

    मृदुला मुकुंद पाटखेडकर.

      १९ नोव्हेंबर २०१६.

Friday, 18 November 2016

वाढदिवस

    आनंदाच्या उत्सवाचा
    वर्षागणिक वाढण्याचा
   जन्मदात्यांच्या आठवणींचा
   त्यांचा आशिर्वाद घेण्याचा
    आजन्म ऋणात राहावयाचा
     नवे संकल्प करावयाचा
    नातेवाईकांच्या गाठीभेटीचा
    मित्रमैत्रिणींच्या मेळाव्याचा
    शुभेच्छांच्या बरसातीचा
    लहानग्यांच्या मनमौजीचा
     राजेशाही थाटामाटाचा
    आजच्या दिवसाचा राजा मीच
     म्हणून मिरवत जाण्याचा
     मिष्टानांवर ताव मारण्याचा
     सर्वांना पार्टी देण्याचा
    वाढदिवसाच्या खास भेटवस्तूंचा
      आनंद वाटून देण्याचा
      आनंद वाटून घेण्याचा
     वर्षभरासाठी स्मृती साठविण्याचा
     क्षणाक्षणाला मृत्यूच्या जाणिवेचा
     तरीही.... वाढता वाढता वाढवितो
     माणूस आनंद वाढदिवसाचा
      आनंद वाढदिवसाचा.......!!!

    मृदुला मुकुंद पाटखेडकर.

        १८/११/२०१६.

Thursday, 17 November 2016

तरुण

     तरुण कसा असण्यातला?
     तरुण कसा दिसण्यातला?
   
     मनातल्या अस्पष्ट, धूसर,
   कल्पनाविश्वाच्या गुलाबी धुक्यातला
   सुंदर, विलोभनीय, आकर्षक,
     मोहक दिसण्यातला

  थरथर, उत्कटता, प्रेम वाटण्यातला
बिनधास्त, बेधडक धडक मारण्यातला

   धिटाईने धडपड करण्यातला
काहीतरी हटके करण्याच्या उमेदीतला

 मनस्वी विचार, भावनांच्या प्रवाहातला
  नसानसातून वाहणाऱ्या सळसळ,
   गरम रक्तातला

   उदंड आशा, उल्हास जीवनातला
अपार आसक्ती, कुतूहल बाळगण्यातला

शूर, वीर, पराक्रमी, निधड्या छातीतला
वरदानच असतो तरुण, तरुण वयातला
वरदानच असतो तरुण, तरुण वयातला
   तरुण वयातला.........!!!

    मृदुला मुकुंद पाटखेडकर.

       १७/११/२०१६.

बदलावं लागतं काळासोबत

     बदलावं लागतं काळासोबत
     वावरावं लागतं जगासोबत
     चालावं लागतं गतीसोबत
    नवनवीन येणा-या लाटांसोबत

      झगडावं लागतं ध्येयासोबत
     जुळवावं लागतं संकटांसोबत
      फुलावं लागतं फुलांसोबत
     राहावं लागतं हसत हसत
     जीवघेण्या काट्यांसोबत

     जिद्दीने उभं राहावं लागतं
     जीव तोडून इराद्यांसोबत
     वाहत राहावं लागतं
    पाण्याच्या प्रवाहासोबत

     धावावं लागतं रोजच्या रोज
     घड्याळाच्या काट्यांसोबत
     पेलून धरावं लागतंच नेहमी
     स्वतःला आव्हानांसोबत

     झोकून द्यावं लागतं स्वतःला
     स्थिर, निरंतर लक्ष्यासोबत
     जीवन जगावंच लागतं
     हो.. हो.. जगावंच लागतं
    अखंड कष्टांच्या धुंद नशेसोबत

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

       १७/११/२०१६.

Wednesday, 16 November 2016

रे मना.....

       रे मना........
      कितीही आले मार्गात काटे
      तरीही चालणं नको सोडू
      कितीही समोर आले खोटेनाटे
      तरीही खरं बोलणं नको सोडू

       कितीही आले दुःख, विघ्न
     दिलखुलास हसणं नको सोडू
     कितीही आले अपयश....
     यशासाठी जिद्द नको सोडू

       कितीही निराशा आली तरी
       आशेचा घेराव नको सोडू
     असभ्यतेच्या काळ्याकभिन्न वेषात
       सभ्यतेचा वेष नको सोडू

       पापी, दुष्ट भावनांच्या गर्तेत
      निष्पाप, निरागसता नको सोडू
       कटू, कडवट, जहरी बोलण्यात
       गोड बोलणे कधी नको सोडू

       असत्य, अन्याय्य, दुराचारात
    सत्यता, न्यायनीतीचे ब्रीद नको सोडू
      असमान, भेदाभेदाच्या दरीत
      समानतेची भर नको सोडू

      अज्ञान, अंधःकाराच्या जाळ्यात
      प्रकाश, ज्ञान विणणे नको सोडू
      कितीही तोडली नाती कुणीही
      जोडणं तू कधीही नको सोडू

     तिरस्कार, अपमान, पराभवात
     प्रेम, मायेने जिंकणं नको सोडू
     निर्दयी, निष्ठूर, जुलुमी वर्तनात
      माणुसकीची साथ नको सोडू

      गरजू, गरीब, दीनदुबळ्यांना
       मदतीचा हात नको सोडू
    अस्वच्छतेच्या गलिच्छ दलदलीत
     स्वच्छतेची वाट नको सोडू

     कितीही झाल्या मरणयातना तरी
     जगण्याची आस नको सोडू
    कितीही झिजला आयुष्यात तरी
     अविरत कष्टांची कास नको सोडू
     रे मना...रे मना...रे मना....
   जे जे चांगलं ते ते काहीही नको सोडू
    .......काहीही नको सोडू.

    मृदुला मुकुंद पाटखेडकर.

       १६ नोव्हेंबर २०१६.

Monday, 14 November 2016

बालपणः - आयुष्याचा पाया

    ज्या गोष्टी प्रत्यक्षात नाहीत; त्या कल्पनाविश्वात बघण्याची पहिली प्रक्रिया बालपणापासूनच सुरु होते, असे मला वाटते. सात-आठ वर्ष वयाच्या आठवणींत वास्तव आणि कल्पनेतल्या जगाचे रंग मुलांच्या मन चित्राने मजेदारपणे एकमेकांत मिसळून रेखाटले असतात. अशा आठवणींचे रेखाटन पुढील आयुष्यात लख्खपणे आठवतं.

    आई, वडील, आजी, आजोबा मला लहानपणी कधी काऊच्या, कधी चिऊच्या, परीकथेच्या, चांदोबाच्या गोष्टी सांगायचे. परीकथेत परी आली. बरं.. हे सगळे कथा इतकी रंगवून सांगत की, डोळ्यांसमोर हुबेहूब परी दिसावी. परी... तिचा तो फुलं लावलेला गुलाबी फ्रॉक, तिचे निळे किंवा घारे डोळे, ती निळ्या आकाशातली तिची झेप, तिला असणारे पंख, मग... ती आपल्या आयुष्यात येऊन सगळा शेवट कसा गोड करते... वगैरे सगळे वर्णन मी हुबेहूब रात्री कल्पनेत रंगवत असे. जसेच्या तसे. मुलांना गोष्ट आवडावी, त्यांनी रमावं म्हणून रमवून रमवून रम्य बालपणात गोष्ट सांगितली जाते. परीकथा अगदी खरीच वाटे. खरंच आपल्याला परी भेटेल असे वाटे. चांदोबाच्या गोष्टींचंही तसंच!! 'चांदोबा, चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का?' हे गाणं रोज आळवलं जाई. चंदा मामाचे तर मला बालपणापासूनच आकर्षण!! त्याचा तो शांत, शीतल प्रकाश मन धुंद करणारा!! रोज दिसणारा मामा चन्द्र!! म्हणूनही तो प्रिय!! स्वप्नांत बरेचदा चन्द्राला पाहिले. तो माझ्याबरोबर पळतांना दिसला. झाडांमागे लपतांना दिसला. पुढे शाळा कॉलेजच्या दिवसांत अनेक चन्द्रावरची हिंदी, मराठी गाणी पाठ केली. चन्द्र आकाशातला एक ग्रह असूनही मला मात्र तो माझा प्रिय सखा वाटायचा!! जेंव्हा प्रथम इंग्रजी शिकले, तेंव्हा रोज मी आधी चन्द्राला 'Good Night' म्हणत असे नंतर झोपत असे.

   विक्रम वेताळाच्या गोष्टी, 'अमृत' मासिक, ईसापनीती, 'चांदोबा', 'अलीबाबा आणि चाळीस चोर' - त्यातील मर्जिनाची हुशारी!! हरी नारायण आपटे यांच्या 'वज्राघात', 'उषःकाल', 'गड आला पण सिंह गेला', या कादंब-या हातच्या सोडवत नसत. एकदा वाचूनही समाधान होत नसे. त्यातील चित्रेही खूप बघण्यालायक असत. बालमन अगदी रमून जात असे. कुस्ती, कबड्डी, खो-खो यांसारखे मैदानी खेळ तेंव्हा रंगत होते. ते पाहण्यातही मुलं रमत असत.

   राजकुमारीच्या गोष्टीत, राजकुमार घोड्यावरुन येतो राजकुमारीला ऐटीत घेऊन जातो. कल्पनेच्या दुनियेत हे सगळे मला लहानपणी जसेच्या तसे दिसे. या सगळ्या छान छान गोष्टी ज्यांनी मला सांगितल्या, माझे बालपण रम्य केले त्या सगळ्यांना आज या बालदिनाच्या निमित्ताने खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात. तुम्ही नसतात तर माझे बालपण होरपळले असते!!!

   ...माझ्या जशा बालपणीच्या आठवणी रम्य आहेत तशाच सर्वांच्या असतील का? असा प्रश्न आज मनांत आला. उत्तर बहुतेक नाही असेच सापडते; कारण अनेक मुलांना गरिबी, अपंगत्व अशा अनेक कारणांमुळे बालपण असूनही उपभोगता येत नाही.

    आजच्या विद्यमान स्थितीत मात्र भौतिक सुखांच्या सहज उपलब्धतेमुळे १२ ते १४ वर्ष वयातील मुलांचे भावविश्व बदलत चालले आहे. अगदी छोट्या खेड्यांपासून ते मोठ्या शहरांपर्यन्त मोबाईल, Laptop इंटरनेट चा नको तितका गैरवापर, नको ते videos आणि games लहान वयात इंटरनेटद्वारे बघणे, नको त्या films बघणे, आई वडील दिवसभर नोकरीच्या निमित्ताने बाहेरच असल्यामुळे, घरी आल्यावरही ते मुलांना फारसा वेळ देऊ शकत नाहीत. मुले घरी कसा आणि कुठे वेळ घालवतात हे त्यांना कळू शकत नाही. कामकाजानिमित्त बाहेर असलेल्या पालकांच्या अनुपस्थितीत ही बालके कुणाचाही धाक नसल्याने मायाजालाच्या मोहपाशात गुरफटत चालली आहेत. शाळा, कोचिंग क्लास आणि घर या प्रवासात अवांतर वाचन तर त्यांना ठाऊकच नाही. वाचन संस्कृती तर अगदीच नगण्य आहे; तरीही नऊ, दहा वर्षाच्या मुलाला चष्मा लागतो!!  लहान कुटुंब, त्यामुळे पाळणाघरातच मुले मोठी होतात. पालक १२ तास कामावर असतात; त्यामुळे आईवडील मुले यांच्यातील संवाद हरवला आहे. घरात आजी आजोबा नसतातच!!! शिवाय टीव्हीवरील कार्टून shows आणि games shows असतातच बिघडवायला!! Technology चा वापर करायला हरकत नाही, पण तो कसा करायचा हे ज्याचे त्याला कळले पाहिजे. आईवडिलांनी मुलांकडे लक्ष दिले पाहिजे, वेळात वेळ काढून!!!

..... देशाचे भावी भविष्य जर चांगले घडवायचे असेल तर बालपणापासूनच मुलांवर चांगले संस्कार असणे आवश्यक असते. पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण वाढत चालले आहे. बालपण समृध्द तर पुढील आयुष्य समृध्द!! म्हणून बालपण हा भावी आयुष्याचा पाया असतो.

   नेहरुंनी छोट्या मुलांवर खूप प्रेम केले, कारण मुले ही निष्कपट आणि निरागस असतात. त्यांच्या इंदिराचे बालपण त्यांनी मनापासून जपले. मी नेहरुंनी इंदिराजींना लिहिलेली पत्रें इंदिराजींनी वडिलांना लिहिलेली अनेक पत्रें कॉलेजच्या काळात वाचली. काही पत्रें तर इतकी भावतरल भावना दर्शविणारी आहेत की वाचकाला रडू येईल!! वडील मुलीमधले ते आदर्श नाते होते. त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीला खूप खंबीर कणखर बनविले.

   आज नेहरु जयंती. बालकदिन. कुणाचेही रम्य बालपणाचे दिवस कोणत्याही जाचक कारणांमुळे हिरावले जाऊ नये, असे आज कळकळीने वाटत असल्यामुळे  हा लेख लिहावासा वाटला.
  १२७ व्या जयंतीनिमित्त नेहरुंना माझ्यातर्फे विनम्र अभिवादन.

  मृदुला मुकुंद पाटखेडकर.

    १४ नोव्हेंबर २०१६.