Saturday, 24 September 2016

कळेल कधीतरी

कळेल कधीतरी ही आस तर नेहमीच मनमंदिरी
श्रद्धा फळेलच हृदयाच्या गाभारी
कळेल, कळेल, कळावे असे नेहमीच जिव्हाग्री
पण आयुष्याचा पट विस्तृत, मन स्थिरावत नाही नासाग्री
आयुष्याचे सारकण वेचता वेचता दृष्टी राहील निरंतरी
थोर महाभागांचे आयुष्य शिकविणारच काही ना काहीतरी
ध्यास घेतला की गोष्टी आकळतातच, ठसतात अभ्यंतरी

जे जे आकळले ते केव्हा ना केव्हा येणारच बाहेरी
यांना जीवन कळले हो असे ठाम म्हणेल का कुणीतरी?
कळले, कळले, कळले असे ओरडावेसे वाटते दिगंतरी
पण नुसतेच शब्द जुळू नयेत ट ला ट री ला री
अभिव्यक्तीला अनुभूति असावी हीच आस अंतरी
शब्दांनी अर्थामागे धावावे हीच मनीषा खरोखरी
प्रत्यक्षाचाच प्रत्यय येतो हेच सांगतात साक्षात्कारी

धुरंधरांचाच विजय होतो आयुष्याच्या रणकंदरी
प्रयत्नांना पर्याय नाही हीच इतिहासाची ललकारी
सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गा या, प्रसन्न परमेश्वरी
त्यांनाच घालतात विजयाची माळ, प्रयत्न आणा 'साकारी.'

प्रयत्नांचे महत्त्व आकळले की सुकर होतो घाट
रस्त्याला रस्ता मिळत जातो सुकर होते जीवन वाट
हे मला कळले, आता कधीतरी म्हणायचा प्रश्न नाही.
समस्या सगळ्याच सुटतात अडायचे कारण नाही.
प्रयत्नांती परमेश्वर, यत्न तो देव जाणावा रामदासांनी लिहीले
त्यांना ते तेव्हाच कळले होते, मला आज कळले
कळता कळता वळत जाते, मन मार्गी लागते
आयुष्याचा सोपान चढता चढता दिगंतरी जाते.

'पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा'
पाण्यासारखे प्रवाही आणि निर्मळ व्हावे 'जीवन सरोवरी'
नाम, रुप, गुण सब परमेश्वर की देन, कोई नहीं ऐसा वैसा
कुठेही ठेचकाळू नको, अडखळू नको या 'जीवन - कांतारी'
जीवन सिखाता है बहुत कुछ, सिर्फ श्रेष्ठ नहीं है पैसा
'पद्मपत्रमिवाम्भसा' हा न्याय ठेव नित्य अभ्यंतरी

वारी करतो तो वारकरी, येतो; विठ्ठला, तुझ्या दारी
एकवार विठ्ठला ये रे, माझ्याही घरी
एकवार येऊन बघ, जाऊ देणार नाही माघारी
खूप दाटी झाली भक्तगणांची पंढरपुरी
तू तर सर्वांच्या हृदयात निवासी, चमत्कारी
रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी
तुला कधीच विसंबू नये माझी वैखरी
नाद माईना अंबरात मन माझे झाले ईश्वरी

षड्रिपूंचा दूर दूर घालवून द्या अरी
नारदाला दिसला कृष्ण प्रत्येक स्त्रीच्या अंतःपुरी
सर्वात्मक ईश्वराच्या कथा सांगा, केव्हातरी, कुठेतरी,
कथा सुचवून जातात खूप मोठा आशय,
उमगतेच मग काहीतरी; कधीतरी

कैवारी, पुढारी, दुहेरी, कातकरी, शेतकरी, गावकरी, वंजारी.......
कितीतरी शब्द, मराठी भाषा आहे समृध्द
बनवा एकेक कथा आणि होऊ दे अक्षरबध्द
आजकाल निरक्षर नाही साधारणपणे कोणीच
निरक्षर असतीलही तरी, अनुभव तर प्रत्येकाचेच प्रत्ययकारी
एखादी अनुभवांना वाचा फोडणारी असतेच 'बहिणाबाई चौधरी.'

     संगीता पाटखेडकर.

       २५/९/२०१६.

No comments:

Post a Comment