Monday, 13 February 2017

वेड 'बालभारती' आणि 'किशोर'चं!!

२७ जानेवारी १९६७ रोजी स्थापन झालेल्या 'महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळाने तयार केलेल्या 'बालभारती' या पाठ्यपुस्तकाचं २०१७ हे पन्नासावं वर्ष; म्हणजेच सुवर्णमहोत्सवी वर्ष!!
 

आज सतत मनांत 'बालभारती' डोकावू लागलं. मुलगा आणि मुलगी दोघं मिळून हसत आणि आनंदानं बालभारतीचं पुस्तक वाचत आहेत; हे 'बालभारती' या पाठ्यपुस्तकांवरील चित्रं डोळ्यांसमोर येत राहिलं. इयत्ता पहिलीपासून ते सातवीपर्यन्त मला 'बालभारती' अभ्यासक्रमात होतं. शाळा सुरु होण्यापूर्वी काही दिवस आधी पुस्तके आणायला बाबांसोबत गेले की, प्रथम पुस्तक बालभारतीच खरेदी केलं जाई. घरी आल्यावर सगळ्यात आधी ओढ बालभारतीतल्या कथा, कविता आणि धड्यांची होती. शाळेत जातांना मैत्रिणींसोबत गप्पागोष्टीतही बालभारतीच असे. आवडलेल्या कथा, कविता, बोधगोष्टी यावर चर्चा होई.

 
दरवर्षी बालभारतीचं पुस्तक विकत घेतलं की कितीतरी वेळ मी त्या मुखपृष्ठावरील चित्राकडे बघत असे. मंडळाचं एवढं मोठं नाव घेता आम्ही सर्व मैत्रिणी या मंडळालाही बालभारतीच म्हणू लागलो. सर्वदूर हेच मंडळ 'बालभारती' या नावानंच प्रसिध्द होत गेलं. दर्जेदार, संस्कारक्षम आणि वैशिष्टयपूर्ण मराठी भाषेची पाठ्यपुस्तके मुलांना अल्प किंमतीत आणि योग्य वेळेत उपलब्ध करुन देणं हे बालभारतीचं मुख्य कार्य आहे आणि ते ती आजपर्यन्त चोखपणे आणि कर्तव्यदक्ष राहून पार पाडत आहे. आमचे मराठी भाषेचे शिक्षकही वर्गावर बालभारतीचं पुस्तक अगदी उत्साहाने आणि आनंदाने शिकवित असत.

 
लहानपणी शिकलेल्या कथा, कविता, चित्रे यांचा अविस्मरणीय आणि विलोभनीय ठसा तर मनावर उमटलाच; पण बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांतून भाषेचे, साहित्याचे आणि वाचनाचे संस्कारही झाले. जीवनाचे, आणि जगण्याचे संस्कार करत, आयुष्यभर साथसंगत करणारी, उत्तम संस्कारांची शिदोरी देणारी बालभारती ही तेंव्हापासूनची माझी तरी एक वाचनसखी बनली. उन्हाळ्याच्या सुटीतही पुस्तके विकता, लहर आली की मी बालभारती वाचत असे. पुन्हा-पुन्हा त्यातील कथा, कविता मनाला सतत खुणावित असत.

 
आजच्या शैक्षणिक असो की कुठल्याही क्षेत्रांतील बदल असो, बालभारतीने ते स्वीकारुन -लर्निंगच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले आहे. ही सर्व प्रकाशने बालभारतीच्या वेबसाइटवर (http://ebalbharati.in) उपलब्ध आहेत. आज पहिली ते सातवीचे शिक्षण घेऊन कितीतरी वर्षे झाली असली तरी माझ्या मनाला मात्र बालभारतीने आपुलकीच्या धाग्यांनी जोडून ठेवले आहे.

 

सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सहजच आज इंटरनेटवर बालभारतीचा वीकिपीडिया पाहिला. कारण कसं असत!! जेंव्हा आम्ही लहान होतो तेंव्हा हे पुस्तक इयत्ता पहिली ते सातवीच्या अभ्यासात होतं. त्या छोट्याशा वयात 'बालभारती' पाठ्यपुस्तकाविषयी, त्याच्या निर्मितीविषयी, संस्थेच्या माहितीविषयी आपल्याला काहीच कळू शकत नाही, आणि कुणी सांगितलं तरी खूप प्रगल्भतेने विचार करण्याचं ते वय नसतं; त्यामुळे या पुस्तकाविषयीची माहिती जाणून घेण्याचं औत्सुक्य मनाला स्वस्थ बसू देत नव्हतं. वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळे पाहण्याच्या अनेक सुप्त इच्छांपैकी पुण्याची ही बालभारतीची वास्तू प्रत्यक्षात पाहण्याची माझी इच्छा आहे; कारण यावर्षीचा फेब्रुवारी महिन्यातील किशोरचा अंक वाचला. त्यातील या वास्तूसंबंधित दिलेल्या फोटोंनी मन आकर्षून घेतले.

 
बालभारतीने आजच्या काळातही स्वीकारलेले नवीन बदल वाचून आनंद झाला. 'बालभारती' माझ्या शैक्षणिक काळातही ताठ मानेने उभी होती आणि आजच्या पिढीसाठीही ती तितक्याच ताठ मानेने प्रेरणा देत आहे आणि यापुढेही देत राहील याची तर पक्कीच खात्री झाली. आज गत आठवणींच्या रेशमी रस्त्यांवरुन जाता जाता माझ्या मनाला लहानपणापासून ओढ लावणारी आणि आयुष्याच्या वळणावळणावर वळण लावणारी 'बालभारती' दिसत राहिली.

 

वेडः- 'किशोर' मासिकाचे!!

 
'किशोर' मासिक हे बालभारतीचाच एक विभाग आहे. १४ नोव्हेंबर १९७१ पासून बालभारतीने 'किशोर' मासिकाच्या प्रकाशनास सुरुवात केली. ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, मनोरंजनाबरोबर त्यांच्या ज्ञानात भर पडावी, चालू घडामोडींची माहिती त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी हे या मासिकाचे प्रमुख उद्देश आणि ध्येय आहे. अत्यंत स्तुत्य उपक्रम 'किशोर' मासिकाद्वारे राबविल्या जात आहे. प्रत्येक महिन्याच्या अंकाची वाट असते; इतकी सुंदर या अंकांची आकर्षक मांडणी आहे.

 

अनेक प्रथितयश लेखकांनी आणि नामवंत चित्रकारांनी मुलांसाठी दिलेले योगदान, महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतच नव्हे तर इतर राज्ये तसेच सातासमुद्रापार देशांतूनही किशोरला मागणी आहे. 'बालभारती' आणि 'किशोर' चे महत्वाचे वैशिष्टय म्हणजे, अत्यंत महागड्या आजच्या जमान्यात ही पुस्तके मात्र अल्प किंमतीत उपलब्ध असून अत्यंत निष्ठापूर्वक आणि प्रामाणिकपणे केलेल्या कार्याचं आणि श्रेष्ठ दर्जाचं प्रतीक आहे. 'किशोर' मासिक लहान मुलांसाठी असले तरी त्यातील साहित्य, चित्रे, कविता, मोठ्या व्यक्तींनाही ओढ लावणा-या आहेत. 'किशोर' वाचण्यातला आनंद अवर्णनीयच!! प्रत्येक अंक संग्रहणीय ठेवण्यासारखा आहे. अनेक उपलब्ध बालसाहित्यातून सरस ठरणारे हे 'बालभारती' आणि 'किशोर' चे वाचन वैभव असेच चिरंतन राहो, हीच माझ्यातर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्तची सुवर्णमयी शुभेच्छा!!!

 
मृदुला मुकुंद पाटखेडकर.

१३//२०१७.

No comments:

Post a Comment