Thursday, 12 January 2017

युवांचा ऑक्सिजनः- विवेकानंद.

  विवेकानंदांची आणि माझी पहिली भेट झाली ती शाळेतच!! त्यांच्यावरचा एक सुंदर धडा इतिहासाच्या पुस्तकात दिला होता. माझ्या शाळेतही ठिकठिकाणी त्यांचे छायाचित्र होते. इतिहासाच्या पुस्तकात सुंदर सुंदर फोटो आणि चित्रं दिलेली असत. मी त्या सगळ्यांकडे आधी एकटक टकामका बघत राही; बराचवेळ!! आणि नंतर हळूवार...यथावकाश धडा वाचायला घेई. शालेय वयातच विवेकानंदांच्या देखण्या, रुबाबदार आणि सुंदर चेहऱ्याने सर्वप्रथम माझे मन आकर्षून घेतले. कितीतरी वेळ मी त्यांच्या छायाचित्राकडे बघत राही. धडा वाचता वाचता कळे की किती गुणांची मालिका या व्यक्तीजवळ होती जी संपणारी!!!

    एका व्यक्तीमध्ये इतके असामान्य वैशिष्ट्यांचे अजब रसायन असू शकते हे वाचून तेंव्हाच डोळे स्तिमित झाले आणि मन अचंबित झाले. त्यांची आध्यात्मिक उन्नती आणि शक्ती पाहून त्यांना संत म्हणावेसे वाटते. मनन चिंतन, एकाग्रता याचे त्यांनी सांगितलेले महत्त्व, गुरु रामकृष्ण परमहंसांवरची निष्ठा, आई वडीलांविषयीचा आदर, स्नेही, मित्रांसाठीचं त्यांचं अकृत्रिम प्रेम, मित्रांचं मनोरंजन व्हावं म्हणून त्यांनी त्यांच्या गोड गळ्यातून गायिलेली गाणी, मित्रांसाठी कधी कधी केलेले चटपटीत रुचकर पदार्थ, "मार्गाधारे वर्तावे l विश्व मोहरे लावावे l अलौकिक नोहावे l लोकांप्रति" ll या ज्ञानेश्वरांच्या उक्तीनुसार कधीही मोठेपणाची शिकार होणारे, गरीब असो की श्रीमंत, सर्वांशी समान आपुलकी आणि प्रेमाने वागणारे विवेकानंद सहजावस्थेत वागणारे होते. हृदयात पराकोटीची देशभक्ती असणारे, देशातील जनतेला सन्मार्ग, स्वयंसिध्दता, सुविचारी बनविण्याच्या दिशेने घेऊन जाणारे प्रामाणिक यात्री होते. त्यांच्या वागण्या, बोलण्यातून ओढ लावणारे, आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीच्या आधारे विदेशातही अनेक व्याख्यानांची सत्रे चालवून मोठमोठ्या विचारवंतांनाही अवाक् करणारे आणि त्यांना विचार करायला भाग पाडणारे एक महान विचारवंत होते. अनेक स्त्रियांना (विशेषतः विदेशीसुध्दा), त्यांच्या व्यक्तिमत्वाने भुरळ घातली, तरीही विचलित होता, प्रत्येकीला माता, भगिनी, आत्या, मावशी असेच संबोधून संयमाची परिसीमा गाठणारे धीरोदात्त चारित्र्यसंपन्न होते.
    विवेकानंद साहसी होते. नदीत पोहणे, कुस्तीत भाग घेणे, यांसारख्या खेळांमध्ये ते माहिर होते. नेतृत्वगुण ठासून भरलेले प्रभावी नेता होते. आपल्या नेतृत्वाच्या ओझ्याखाली कुणीही गुदमरून जाऊ नये यासाठी सर्वांशी सहज वागणारे आणि निगर्वी होते.

 ......या सगळ्यात महत्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन त्यांनी युवकांना केले आहे. स्वतः त्यांचे जीवन युवावस्थेचा समग्र आविष्कार होते. ते 'युवाचेतना' आहेत. प्रत्येक युवकाच्या अंतर्यामी चैतन्यरुपाने वसत आहेत. आयुष्य परिपूर्ण पूर्णत्वाला पोहोचण्यासाठी, प्रामाणिक कष्ट करुन, परमसिध्दतेला नेण्यासाठी या सिध्दहस्त, तेजाळ, स्वामीने जीवाचे रान करुन दुर्दम्य आशावादाची ज्योत युवकांच्या हृदयात प्रज्वलित केली. "तुझ्यातच आहे पुरुषार्थ, बलदंड शरीर, साहस, ताकद, स्वप्नांची ओढ आणि असामान्य धैर्य"!!! याचा विश्वास आणि प्रेरणा त्यांनी युवावर्गात जागृत केला. त्यांच्या स्वप्नातला युवक हा हनुमंतासारखा असायला हवा. सर्व प्रकारच्या दौर्बल्यापासून, कार्पण्यापासून दूर राहणारा, ध्येयावरची अतूट निष्ठा असणारा, सर्व प्रकारच्या प्रलोभनांपासून, खोट्या प्रतिष्ठा आणि आमिषांपासून स्वतःचे रक्षण करणारा, मर्मभेदी बुध्दिमत्ता आणि स्फटिकासारखे स्वच्छ चारित्र्य असणारा हवा. विकसित व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण आविष्कार हनुमंताप्रमाणेच देशातील तमाम युवकांमध्ये असायला हवा, हे स्वप्न त्यांनी पाहिले होते.

...पण!!! विवेकानंदांचे स्वप्न हे स्वप्नच राहील का?? आजचा युवक ते सत्यात आणण्याच्या पात्रतेचा आहे का?? उत्तर खेदाने 'नाही' असे लिहावे लागत आहे. कसा आहे आजचा बराचसा युवावर्ग??

  आजच 'लोकमत' वर्तमानपत्रातील पुरवणी वाचली. मन खिन्न झाले. पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण सुरु आहे. शाळकरी मुलांनाही 'गर्लफ्रेण्ड' असते. शहरातल्या निर्मनुष्य जागी या प्रेमी युगुलांची गर्दी दिसते. तासन्तास वेळ ते फुकट घालवून घरच्या लोकांना फसवित असतात. इंटरनेटचा वापर हा बुध्दीजीवी होण्यासाठी केला पाहिजे. हे युवक, युवती मात्र social media चा बीभत्स वापर करीत आहेत. भटके, लफांटु, पोकळ, प्रेमीजीव म्हणून मिरवित आहेत. अविवेकाची द्वारे खुलेआम उघडली जात आहेत. विवेक आणि त्यातून मिळणारा आनंद यांची द्वारे त्यांच्या मनाने कडी आणि कुलूप घालून  बंद केली  आहेत. ज्या विवेकानंदांनी 'तुझ्यातच आहे सामर्थ्य आणि शक्ती'!! - असा ठासून आत्मविश्वास आणि अॉक्सिजन युवकांना दिला होता, त्या 'नरेन्द्र विश्वनाथ दत्त' चे विचार 'दत्त'!! म्हणून प्रत्येक युवकाच्या डोळ्यासमोर उभे ठाकण्याची आजही नितांत गरज आहे.

   मकर संक्रांतीच्या महिन्यात जन्माला येऊन विचार आणि आदर्शांचा भलामोठा प्रकाश आणि ऊर्जा; संपूर्ण मानवजातीला अंधारातून बाहेर काढण्यासाठी अविरत तळपत राहणाऱ्या या तेजोगोलाने दिला. संक्रांतीला नवे परिमाण देणारा हा प्रज्ञासूर्य अवतरला. त्यांनी मांडलेल्या मौलिक विचारांचा ठेवा व्यर्थ जाता, पिढ्यान्पिढया सर्वांमध्ये संक्रमित होवो हीच मकर संक्रमणाच्या पर्वाची आणि त्यांच्या जयंतीची फलश्रुती ठरेल......

    मृदुला मुकुंद पाटखेडकर.
        १२//२०१७.

       विवेकानंद जयंती.

No comments:

Post a Comment