Saturday, 11 June 2016

अहंकाराचा वादळवारा

 धाव धाव धावलास l काय मिळविलेस?
 समज तर, जन्माला आल्याबरोबरच नव्हती ना? आपण म्हणू या, समजायला लागते साधारण वर्षांनंतर. मग मी - माझे - आपले - परके - सर्व भावना - स्वतःचा फायदा, स्वतःचे दुःख, स्वतःचा मान आणि अपमान, स्वतःचे शिक्षण, स्वतःचे करिअर, स्वतःची नोकरी, स्वतःचा प्रपंच, स्वतःची मुले - काय नि काय - गेले की बरेच आयुष्य यातच!
यात कुठे काही बिनसले की मग विचार करतो माणूस, की काय याचा अर्थ?
कशासाठी एवढी धडपड? कुणासाठी?
उत्तर काय? तर व्यर्थच ना सर्व? मग आता काय? ज्याला 'मी' म्हंटले ते तर शरीर होते. शरीर दुःख देणारे, प्रपंच दुःखदायी. कुणाला कुणाचे तसे काहीच करायचे नाही. जो तो मी - माझे यात गुंतलेला. मग सारे तत्वज्ञान आठवते! मग शोध सुरु होतो आणि शोध काय सांगतो? किती दिसांचा निवास येथे देतो का विश्वास? आपल्याला आपल्याबद्दल काहीच माहीत नाही हा शोध डोळे खाडकन् उघडतो.
   'अनेकी सदा एक देवासी पाहे' - रामदास आठवातात. 'जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा' - अवतरणे आठवतात. मनाशी संवाद कधी साधलाच नाही. 'आपुलाचि वाद आपणासी' कधी कळलेच नाही. मनाची गती अव्याहत चालूच आहे. त्या गतीची तुलना दुसऱ्या कशाशीच करता येत नाही; हे तर खरेच पण चित्त स्थिर केल्याशिवाय शांतता कुठून मिळणार? जन्मभर अभिमान, अहंकार या भावना सर्वश्रेष्ठ ठरल्या! अहंकारावर विजय केवळ मन स्थिर करुन, मनाशी संवाद साधला तरच मिळणार! अनेक दोषांचे गाठोडे पाठंगुळी बांधून आजवर वावरलो याचे ज्ञान होणार.
 "काय सांगू या संतांचे उपकार
  मज निरंतर जागविती" - तुकाराम.
कितीही ग्रंथ वाचले तरी जे ज्ञान होणार नाही ते स्वानुभवाने मिळणार!
  'आत्मपरीक्षण' करण्याची सवय माणसाला उच्चतम पातळी गाठण्यास मदत करते. इच्छा असली तर माणूस वरच्या पायरीवर पोहोचतो, पण अहंकार त्याला पुनःपुन्हा खाली खेचण्याचे कार्य सोडीत नाही. तो प्रबळ असतो. खरा शत्रू तुमच्याजवळच असतो. एक निसर्गातील साधे, सुंदर फुल तुमचा अहंकार नष्ट करण्याचे काम करु शकते. फुलाचा रंग, सुवास, त्यातील परागकण, वातावरणनिर्मितीला त्या फुलाने दिलेला सहभाग या गोष्टी बघितल्या तर तुमच्यात बदल करण्याचे सामर्थ्य त्या एका फुलात आहे हे लक्षात येईल! म्हणून निसर्गाच्या जवळ जा. पदोपदी नतमस्तक होण्याची इच्छा होईल.
  आमूलाग्र बदल व्यक्तित्वात होईल; पण माणूस 'अहं' च्या इतक्या बंदिस्त कोठडीत मश्गुल असतो की त्याला त्यासाठी वेळ कुठला? त्यात काय ठेवले आहे? मी बघा - किती मिळवितो? माझे ज्ञान बघा - किती विद्यार्थी माझ्या हाताखालून तयार झालेत? गर्व गर्व आणि गर्व आणि ताठा - किती तो ताठा की चांगल्या गोष्टींसमोर तुम्हाला नतमस्तक होण्याची लाज वाटते? अनेक शुभ, सुंदर, प्रसन्न, आनंददायी गोष्टींपासून वंचित राहणारे दुसऱ्यांचे काय भले करणार?
"भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी" - म्हणणारे तुकाराम जिथे पुरी पडले नाहीत तिथे इतरांची काय कथा? सतत बिंबवत राहिले तरच बिंब अंतरी प्रकाशते; म्हणून 'भजन.' 'भजन' खरे तेच की जे सा-या आयुष्याचा 'प्रसाद' करुन टाकते. भोजन, परिसर, आचार-विचार, संस्कार या सर्वांतील निर्मळता भजनात उतरुन प्रसादाला गोडवा येतो. विष्णू भक्ताचा अहंकार जिरविण्याचे कार्य करतो. खूप भोग विष्णूला चढवावे लागतात. अलंकार, वस्त्रप्रावरणे, सुंदर फुलांचे हार, तुळशीमाळा, खूप पक्वान्ने, हे सर्व झाल्यावर माणसाला वाटते, 'चला, मी खूप छान पूजा केली, किती भोग चढविले विष्णूला?' आला की अहंकार. हा अहंकार जिथे नष्ट होईल तिथे खरे भजन खरी पूजा होईल!
 जोपर्यंत कृष्णकथा - भागवत सांगितले नाही तोपर्यंत व्यास प्रसन्न झाले नाहीत. दुःखी राहिले. 'परमेश्वराची स्तुति' चित्तवृत्ती शांत करण्याचे कार्य करते.
जप-जाप्य, पूजा-अर्चा यात तुमचे मन असले पाहिजे. 'मनाचे स्थिरत्व' ही गोष्ट अत्यंत महत्वाची! देवालाही भक्ताची आस असते. देवही भक्ताची वाट पाहत असतो म्हणून देवघरात जाण्याआधी त्याला कल्पना द्या की तुम्ही त्याच्या प्रार्थनेसाठी येत आहा म्हणून. तोही तितक्याच आतुरतेने तुमचे स्वागत करील!
  तुम्ही काय अर्पण करता - पत्र, पुष्प, फळ, पाणी, प्रसाद हे महत्त्वाचे नाही.आपण कोण त्याला अर्पण करणारे? त्यानेच दिलेले त्याला अर्पण करावयाचे? आणि अभिमान धरावयाचा की, 'मी' अर्पण केले म्हणूनतो तुमच्याकडून तुमच्या -या भक्तीभावाची अपेक्षा करतो. तिथे दंभ उपयोगाचा नाही. देखावा नको.
 "मन शुध्द तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाचीतु चाल पुढं तुला रं गड्या भीती कुणाची? अन् पर्वा ही कशाची?" - अशी निर्भय अवस्था प्राप्त करुन देण्याचे सामर्थ्य फक्त शुध्द आचारसंहितेत आहे. तुमची शुध्दतम आचारसंहिता तुम्हालाच तयार करायची आहे.
प्रकाशमान होणारे सूर्यबिंब पाहण्याचा आनंद अलौकिक आहे. सर्व वातावरणात इतके तेजस्वी किरण पसरले असतात की ते तेज नेत्र दिपवून टाकते. सगळ्या चराचराला प्रकाशमान करण्याचे सामर्थ्य त्या बालसूर्यात आहे. असे अनेक सूर्य आणि अनेक सूर्यांचा उद्गाता तर तुम्हाला दिसतच नाही कारण तुमच्या लौकिक दृष्टीला तो दिसणे अशक्यच! त्याचे दर्शन घ्यायचे तर तिथे -या भक्तीभावाने नतमस्तक होऊन त्याच्या कृपादृष्टीचा साक्षात्कार अनुभवावा लागेल! ते बुध्दीचे काम नाही. बुध्दी यावर कधीही विजय मिळवू शकणार नाही. बुध्दीच्या खूप पल्याड, तो तुमची वाट बघतो आहे. भक्तीचा जिव्हाळाच त्याला खेचून तुमच्यापर्यंत आणतो. ते सामर्थ्य, त्याचा साक्षात्कार अनेकांना झाला आहे. आपण त्या तोडीचे नाही हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत दगड तो दगडच राहणार!
  हे मना, दगड बनू नकोस! चराचरात व्यापलेल्या ईश्वरी साक्षात्काराचे दर्शन घेण्याची जिद्द ठेव!

     संगीता पाटखेडकर.
         १५//२०१६.

No comments:

Post a Comment