Sunday, 19 June 2016

आयुष्याचा समृध्द आधारवड

  आयुष्याचे भांडार समृध्द करणाऱ्या अनेक व्यक्ती आयुष्यात येणे हे केवढे अहोभाग्य! आम्हांला ते लाभले आहे याचा आनंद तर अवर्णनीय आहेच पण हे सर्व ऋणानुबंध पुढील जन्मांच्या साखळीतही चालूच राहणार असा मला विश्वासही आहे. इतके प्रेमाचे धागे कच्चे कसे असणार? वडाला धागा गुंडाळतात आणि सात जन्म हाच पती मिळो अशी प्रार्थना स्त्रिया करतात यामागे हाच विश्वास आहे. सत्यवान आणि सावित्री ही कथा अजरामर याचसाठी आहे. पिढ्या-पिढ्यांचा प्रेमावरील, पातिव्रत्यावरील, अमरत्वावरील विश्वास वाढविणारी ही चिरकालीन संवेदना अंतरंगात भावनांचा उमाळा निर्माण केल्याशिवाय राहत नाही. माझी आई, माझे वडील हयात नसतानाही तीन दिवसांचे वटपौर्णिमेचे व्रत करते. ९१ व्या वर्षीही ती त्यापासून हटत नाही. आता यात काय अर्थ आहे? म्हणणारे म्हणोत पण निष्ठा ही लादण्याची गोष्ट नाही. मुळातून जे आहे तेच बहरणार. आडातच नाही तर पोहो-यात कुठून येणार? असो.
   वड ही प्रतिमा लहानपणापासून स्त्रीच्या मनात रुजलेले एक प्रभावी बीज आहे.
सा-या जन्माला व्यापून उरणारी ही वटसंकल्पना स्त्रीला खूप उच्चतम पातळीवर नेते. शांता मावशीकडचे वडाचे झाड - नटून- सजून स्त्रिया पूजेला यायच्या. मावशीच्या भेटीने त्या पूजेची सांगता करायच्या. शांता मावशी बाळशास्त्री हरदास हे फक्त देऊळ राखायचे नाहीत तर मूर्तीमंत देऊळच होऊन जायचे. गाई-म्हशींचा गोठा; आमच्या पाताळेश्वर मार्गावर असणाऱ्या ठिकाणीही मोठे वडाचे झाड होते. तिथे आम्ही सर्व बहिणी आई पूजेला जात असू. अगदी पावित्र्याचा माहोल असे. आंबा हे या काळातील अमृतफळ. त्या रसाचा गोडवा जीवनात उतरल्याशिवाय कसा राहील? 'नंदनगिरी' ब्राह्मण पूजा सांगायला असत. अगदी सांगोपांग पध्दतीने व्रत आई करायची. सप्तधान्याच्या वाट्या ब्राह्मणाकडे पोहोचविल्या जात. आज काळ खूप म्हणजे खूपच बदलला असला तरी हे सर्व करणाऱ्या स्त्रियांसमोर नतमस्तक व्हायलाच होते. मृदुलाला शांता मावशीने सत्यवान-सावित्री ची कथा सांगितली होती. मावशीचे सांगणे अत्यंत ओघवती भाषेत पूर्ण कथेला जिवंत करणारे असेजिथे जिथे आमचा मुक्काम झाला तिथला तिथला वड मी पूजला आहे. माझ्या ठिकाणी श्रद्धा नाही असे मी कधीच म्हणणार नाही. नास्तिक होण्यात मला काहीच रस नाही.
    मृदुलाच्या जन्मानंतर आम्ही एक वर्ष हैद्राबादला होतो. तेथे 'कोटी' म्हणून एक भाग आहे. तिथल्या वडाला मला मृदुलाचे वडील पूजेसाठी घेऊन गेले होते हे मला आज प्रकर्षाने आठवत आहे. बबन मंगदे असो की त्यांची आई 'बहिणा,' द्वारका नानी असो की भय्या सास्तीकरांचे कुटुंब;- या सर्वांची आणि संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींची वटवृक्षाची साऊली मला नेहमीच मिळाली आहे. वटवृक्षाच्या मायेचा स्पर्श अनेकानेक व्यक्तींच्या रुपाने लाभणे यापेक्षा सौभाग्य ते कोणते? मी सर्वचजणांची अपरंपार ऋणी आहे. यादी खूप मोठी आहे. मनाचे भांडार खूप समृध्द आहे. माझ्या भावना सर्वांपर्यंत पोहोचणारच याची मला नितांत खात्री आहे.
   हा आयुष्याचा वड आता खूपच बहारदार झाला आहे. मनाच्या वारुवर स्वार होऊन त्रिखंड धुंडाळण्याची आस त्याला आहे. तिथे सदाशिव आहे, मुकुंद आहे, प्रमोद आहे, विश्राम आहे, अरुण आहे, सुधीर आहे. वृंदा विजया नित्य साद देत आहेत. सत्यभामा, मुरलीधर बळ देत आहेत. वडीलांचे आई-वडील आम्ही बघूही शकलो नाहीत याचा आजही खेद आहे. "अनंत हस्ते कमलावराने l देता किती घेशील दो कराने?" - असा भरघोस आशिर्वाद देणारी माझी सासूबाई आहे. अत्यंत प्रेमाने मला सावरुन घेणाऱ्या मोठ्या जावा आहेत. सुभद्राबाई पाटखेडकर आणि ताराबाई पाटखेडकर. प्रेमाचा अखंड वर्षाव करणारे सासरचे लोक आहेत. माहेरची प्रेमाची बहती गंगा तर अविरत वाहतेच आहे. पार आकाशाची  उंची या वडाने गाठली आहे. प्रेमाचा अर्थ या सर्वांनी मला जाणवून दिला आहे. मी खूप आनंदी आहे. 'वडा, मला पाव' असे म्हणण्याची माझ्यावर वेळ आलेली नाही यातच मी कृतार्थ आहे.
   आयुष्याच्या समृध्दतेने मी खूपच भरुन पावलेली आहे. हेच मला आवर्जून आज सांगावेसे वाटत आहे. माझ्या आयुष्याच्या वडाने असेच नेहमी बळकट राहून पारंब्यांचा दूर दूर पर्यंत सर्वांना बहारदार, रमणीय असा संसर्ग मिळावा ही मी माझ्यातर्फेच सदिच्छा व्यक्त करीत आहे.
   ज्यांचे उल्लेख आलेले नाहीत त्यांनी हिरमुसून जाऊ नये. मनाच्या कानाकोप-यात, अगदी अंतर्मनात नेहमीच त्यांचा निवास आहे; हा विश्वास ठेवा. अजूनपर्यंत विसरण्याची मला खोड नाही, त्यामुळे सगळ्यांचा दरवळ आहेच आहे
वड म्हणतो, फार झाली वडवड    
आता थांबव तुझी बडबड स्वतःच्या गुणगानाची किती तुला  आवड?
 चूप बस आता, दुसरा मार्ग निवड!

     संगीता पाटखेडकर.

         १९ जून २०१६.

No comments:

Post a Comment