Tuesday, 26 July 2016

गतीशील आयुष्य

आयुष्य कसे आहे याचे उत्तर देणे फारच कठीण आणि अगम्य!
यश-अपयश, सुख-दुःख, मान-हानि, जय-पराजय यांच्या चक्रात सतत फिरत असतो माणूस, त्याला तारेवरची करावी लागते कसरत आणि ठेवावे लागते नेहमीच तारतम्य! (())
  यशाचा आनंद उपभोगताना अवचित ठेच लागते आणि वेदनेचा कढ गिळावा लागतो जय आटोक्यात येतो आहे असे वाटते ना वाटते तोच पराजयाचे मळभ दाटून आलेले असते. टाळ्या वाजविता वाजविता लोक अपमानाचे शब्द दगडासारखे भिरकवतात  हृदयाला जखम होऊन कंठशोषाचे विष प्यावे लागते विष पचविण्याची ताकद प्रत्येकात कशी असणार?
हाय रे दैवा! वेदनेचा कढ गिळावा लागतो (())
   प्रत्येक माणसाचे आयुष्य म्हणजे जीवन-मरणामधली एक मोठी 'गाथा' असते. कितीतरी घातपात, अपघात, अडथळे, संकटे आणि आसन्नमरण दुःखाचा तो मोठ्ठा पाढाच असतो. अधूनमधून सुखाचा शिडकावा मनाला हर्षित करतो. चार सुखाचे, आनंदाचे क्षण त्याचे जीवन प्रफुल्लीत करतात. प्रसन्नतेची झालर डोलायला लागते. याच चार क्षणांनी त्याची बिकट पाऊलवाट, हिरवीगार झालेली असते आणि माणूस आनंदाचा झुला झुलतो. झुला खूप उंच उंचही जातो. नैराश्याचे दुःख विसरायला लावण्याची ताकद या चार सुखाच्या शिंतोड्यात असते. किती ही आनंदाची ताकद! ती वाढवू या! आणि आयुष्याची गाथा रसभरीत करु या! (())
  "काठोकाठ भरु द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या, प्राशन करिता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू द्या" - असे कुणी कवी महाशयांनी म्हंटलेच आहे ना! आयुष्य हे हारण्यासाठी नाही. प्रसंगांवर मात करण्याचे नाव आहे आयुष्य! दुःखाशी फुगडी खेळा, अपयशाशी हुतूतू खेळा, पराजयाचा लपंडाव ओळखा आणि क्रिकेटमध्ये द्विशतक झळकविणा-या सामनावीरासारखे ताठ मानेने आयुष्याची बाजी लढा म्हणजे बघा कसे आनंदाने ऊर भरुन येतो. दुःख लांब पळालेले असते. पराजय तर आसपास फिरकायलाच घाबरतो. अपयश खूपच ठेंगणे, खुजे, बुटके झाले असते आणि मानाचा तुरा तुमच्या आयुष्याच्या शिरपेचात झळकत राहतो; अखंड आणि अविरत! (())
   आयुष्याची वाटचाल करता करता कितीतरी कामें करण्याची राहून गेलेली असतात. ती सुखाव्याच्या क्षणी आठवा. ती कामें तशीच राहून जातील तर काय उपयोग? कामें खुणावतात, ती करा. त्यांना न्याय द्या! म्हणजे बघाः- आयुष्याची टोपली कितीतरी फळाफुलांनी लगडलेली दिसेल! कोणतेच काम कमी दर्जाचे नाही. रस्त्यात मोठ्ठा दगड पडलेला आहे. तो तसाच पडलेला राहू देता बाजूला करा. इतरांचाही मार्ग सुकर करा. आनंदाचे देणे हे इतके साधे आणि सोपे असते. (())
   अनेकांनी असे जिकीरीचे जीवन इतरांसाठी जगून त्यांच्या स्वतःच्या आयुष्याची वाट निरामय केली आहे. प्रत्येक क्षण तुम्हाला साद घालतो आहे.
  आला क्षण, गेला क्षण, असे क्षणभंगुर आयुष्य चिरंतन करण्याचा सोपा मार्ग म्हणजे क्षणांची महत्ता समजणे! अखंड प्रयत्नरत राहूनच या क्षणांची किंमत चुकविता येऊ शकते. विवेकानंद महिन्यात फ्रेंच भाषा शिकले त्यांनी फ्रान्समध्ये फ्रेंच भाषेतून व्याख्यान दिले. विनोबा भावे अनेक भाषांचे नुसते जाणकारच नव्हते तर त्या-त्या भाषेतील साहित्याचाही ते जवळून परिचय करुन घेऊन त्यावर अस्खलित बोलू लिहू शकत असत. कामांना कमी नाही. कर्तृत्वाचा भरधाव रथ कुणीच रोखू शकत नाही. (())
  इतिहासातील सनावळ्या लक्षात ठेवणे कठीण आहे खरेच! पण माणसांनी दाखविलेले कर्तृत्व तर विसरु म्हंटले तरी विसरता येणार नाही. भूगोल पालथा  घाला. इतिहास धुंडाळा, आत्मचरित्रें वाचा आणि आकाशाला गवसणी घालण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवा. बघा, आकाश कसे ठेंगणे होते ते!
  "उत्तिष्ठत, जाग्रत प्राप्य वरान् निबोधत" - हे विवेकानंदांचे आवाहन नुसते पाठ करावयाचे नसून ते आचरावयाचे आहे.
"घड्याळाचा टोल वाजे ठणाणा
आयुष्याचा नाश होतो राम कां रे म्हणाणा"! - अशी एक उपहासात्मक कविता आठवते. मला उपहास करावयाचा नाही. प्रयत्नरततेतील आनंदाचा आस्वाद घेण्याची वृत्ती ठेवल्याने खाचखळगे बाजूला सरुन पायवाट तयार करण्याचे सामर्थ्य येते हे सांगायचे आहे. (())

      संगीता पाटखेडकर.

         २६//२०१६.

2 comments:

  1. व्वा! आई! खूप छान; प्रेरणादायी लिहिलेस.

    ReplyDelete