Monday, 18 December 2017

रविकिरण मंडळाचा उषःकाल


रे. टिळक, बालकवी, गोविंदाग्रज या कवी त्रयीने १९०९-१० ते १९१९-२० या कालखंडात 'मनोरंजन' मासिकाला विलक्षण लोकप्रियता मिळवून दिली. या कालविभागाला मनोरंजन कालखंड असे म्हणू या. या काव्यांवर महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय वाचक जिव्हाळा आणि उत्सुकतेने अगदी तुटून पडला 

या काळाच्या आरंभी लोकमान्य टिळक कारागृहवास (मंडालेला) भोगत होते. या काळाच्या शेवटी शेवटी महात्मा गांधींच्या सामर्थ्याने लोक चकित होत होते. पण मध्यंतरीचा काळ स्वस्थ सुस्तपणाचा होता. यातच रविकिरण मंडळाचा जन्म झाला. नाना रानडे यांच्यामुळे हे मंडळ अस्तित्वात आले. अनेक कवींचे ते यशस्वी मार्गदर्शक होते. Romantic कवींचा काळ म्हणू या आपण - बालकवींच्या 'फुलराणी' इतकी सुंदर कविता याच काळातील.  

रे. टिळक, बालकवी, गोविंदाग्रज यांच्या कविता म्हणण्यात रविकिरण मंडळाने अक्षरशः रात्रीच्या रात्री घालवल्या. शाळा कॉलेजात जाणाऱ्या मुलींची संख्या किंचित वाढली होती. 'भयचकित नमावे तुज रमणी' अशी काहीशी अवस्था तरुणाईची झाली होती. Golden Treasury च्या अभ्यासाने इंग्रजी साहित्याच्या रसग्रहणाने सौंदर्याभिमुख दृष्टी तयार होत होती 

नाना रानड्यांनी पुण्यास कॉलेजात शिकत असताना प्रेमविवाह केला. हे दांपत्य पुण्याच्या पुरोगामी तरुण-तरुणींचे म्होरके बनले. त्यांच्या घरी तरुण मंडळींनी एकत्र यावे, काव्यशास्त्र विनोद करावा, फिरायास जावे, सहली कराव्या अशी अभिनव परंपरा सुरु झाली. अर्थातच त्या काळच्या सनातनी सुधारकी या दोन्ही गटांना हे काहीच आवडले नाही. माधवराव पटवर्धन, यशवंतराव पेंढारकर, शंकरराव कानेटकर, ..गोखले, दिवाकर, वि.. घाटे, माडखोलकर...असे भिन्न भिन्न प्रकृतीचे प्रवृत्तीचे कवी एकत्र आले 

रविकिरण मंडळ हा एक छोटासा सामाजिक सांस्कृतिक प्रयोग होता. ते काही बंदिस्त Trade Union नव्हते. कवी नसलेले अनेक तरुण मंडळाच्या कार्यक्रमात सामील असत. त्यावेळच्या सर्व जुन्या नव्या कवींशी मंडळाचे संबंध मित्रभावाचे होते. मायदेव, अज्ञातवासी, टेकाडे, सुमंत, रेंदाळकर, नागेश, तांबे हे सर्व मंडळाचे जिव्हाळ्याचे स्नेही बनले. 'प्रणयपंढरीचे वारकरी' म्हणून बाळकृष्ण अनंत भिड्यांनी मंडळाच्या नवीन काव्य प्रकारावर सपाटून टीका केली. पण त्यांनाच मंडळाने स्वतःचे पुस्तक अर्पण केले. १५-२० वर्षे रविकिरण मंडळाने महाराष्ट्राच्या तरुण मनाचे प्रतिनिधित्व केले 

नवीन वृत्ते, नवीन चाली, नवीन शब्दसंकेत यांचा अवलंब अपरिहार्यच होता. हे सर्व मान्य होण्यास काही काळ लागला. आरंभी विरोध हेटाळणीच झाली. 'आहेस तू जगी या खोटे खरे ठावे' - माधव ज्यूलियनांची ही ईश्वरपर गझल कुणाला 'मशिदीतला मंत्रजागर' वाटली. फर्ग्युसन टेकडीच्या पहिल्या टप्प्यावरच रविकिरण मंडळाचा 'कविकातळ' स्थापन झाला 

नाना रानडे - मनोरमाबाई रानडे या जोडप्याने अद्भुतरम्य वातावरणात 'काव्यबीज' लावले. लांबलांबच्या सहली, उषःकालापूर्वी टेकडीवर जाऊन उगवत्या सूर्याचे स्वागत करायचे, रात्रीच्या रात्री जागून काढायच्या, पोहायचे, डुंबायचे, वनभोजनें करायची, काव्यचर्चा करायची, जीवनचर्चा करायची, जीवनरस काठोकाठ पिण्याची तत्परता मंडळाने दाखविली. मध्यम वर्गाच्या आधुनिक तरुणांच्या आंतर जीवनाचा मंडळाच्या काव्यात आविष्कार झाला. त्यांची सहानुभूती व्यापक, नानाविध खोल होती.
 

'आम्ही बसतो अंधारात, नैराश्याचे गाणे गात' अशा ओळी गात माधव ज्यूलियन पुण्यात आले. ते स्वप्नाळू, माणूसघाणे, कच्च्या भाज्या खाऊन भूक भागवायचे. दीड दीड दिवस खाटल्यावर झोपून राहायचे, चार माणसांतून, चाललेल्या संभाषणातून एकदम निघून जायचे, थट्टा केली तर डोके फिरवून घ्यायचे, त्यांचा आवडता ग्रंथकार अग्निमांद्याने पछाडलेला कार्लाईल - हे वर्णन वाचल्यानंतर रविकिरण मंडळाने काय जादू केली माधव ज्यूलियनांचे 'विरह तरंग' आठवा. एक अमर खंडकाव्य त्यांनी जन्माला घातले हे आठवा. त्या काव्याची नादमधुरता, भाषासौंदर्य आठवा. किती फरक झाला - सर्व औदासिन्य रसिकांचेही घालवण्याचे सामर्थ्य त्यात आहे.
 

यशवंतराव पेंढारकर साता-याच्या -याखो-यातून पुण्यास येऊन थडकले. ते त्यावेळी १७ व्या शतकात वावरत होते. समर्थ रामदासांच्या मागे कल्याण स्वामीसह शिवथरच्या घळीत भटकत होते. निरीक्षण सूक्ष्म, भावना तीव्र, मराठमोळी भाषा, इतिहासप्रेम. त्यांची प्रसिध्द 'आई' आठवा 

शंकरराव कानेटकर 'कवी गिरीश' हेही सातारा जिल्ह्याच्या दक्षिण भागातले. त्यांचाही पिंड मराठ्याचा. बालकवी, गोविंदाग्रजांच्या अद्भुतरम्य परंपरेतले सौंदर्याचे गानाचे उपासक. 'ग्रहांचे साह्य त्या शूरा यशश्री पायीची दासी' असेच या सर्व मंडळींचे झाले 

रविकिरण मंडळातल्या कवींना Neo Romantists म्हणायला हरकत नाही. मागील कवींच्या काव्याचा पाया मजबूत होता. १५-२० वर्षांचा कालखंड काव्याच्या इतिहासात गाजविणे मुळीच मामुली गोष्ट नव्हती. 'रौप्य महोत्सव' मंडळाचा होणे, (१९४९) त्या काळात पुढच्या कवींसाठी एक प्रेरणाच होती. नाना रानडे या महोत्सवाचे अध्यक्ष होते वि.. घाटे हे स्वागताध्यक्ष होते 

१९२१-२२ मध्ये अत्यंत जिव्हाळ्याने डोळसपणाने नानांनी माधव ज्यूलियनांच्या नव्या काव्याचे अभिनंदन केले. तितक्याच आपलेपणाने १९३८-३९ मध्ये संकोची वृत्तीच्या मर्ढेकरांचे! त्यांच्या संज्ञा प्रवाहाला त्यांनी वाट काढून दिली 

संगीता मुकुंद पाटखेडकर.
१८/१२/२०१७.

No comments:

Post a Comment