Wednesday, 20 April 2016

आयुष्याची इतिकर्तव्यता

आयुष्य हे एक माणसाला नेहमी कोड्यात टाकणारी विलक्षण चीज आहे. वाल्याचा वाल्मिकी होण्यासाठी, वाल्या जिथे चोरीमारी, लुटालूट करुन स्वतःच्या कुटुंबाचा निर्वाह करीत असे. तिथे नारद त्या जंगलातून जात असताना, त्यांनाही लुटण्याचा वाल्याने प्रयत्न केला. ते म्हणाले, आधी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे आणि मग माझ्याजवळ काय जे आहे ते लूट - मनसोक्त! नारद म्हणाले, तुझ्या कुटुंबियांना विचारुन ये की ज्यांच्यासाठी तू इतके पाप करतो आहेस, त्यात ते सहभागी होणार का? तो गेला, त्याला नाही हे उत्त्तर मिळाले. नारद म्हणाले, मग आता एक कर, 'मरा', 'मरा' म्हणण्याऐवजी 'राम', 'राम' म्हण. तुझा उध्दार होईल. वाल्या पश्चात्तापाने पोळून निघाला. नारदाच्या शब्दांवर विश्वास ठेवून त्याने रामनाम घ्यायला सुरुवात केली. वारुळे अंगाभोवती तयार झाली. भूक, तहान, झोप सगळ्यांवर विजय मिळविला आणि वाल्मिकी ऋषी झाला. हे सर्व आपणा सर्वांना माहीत आहे. 'वाल्मिकी रामायण' लिहिले. त्यांनी लिहिले त्याप्रमाणे 'रामायण' घडले. सीतेला त्यांच्या आश्रमात त्यांनी मुलीप्रमाणे सांभाळून लव-कुशला सर्व क्षत्रियधर्माचे शिक्षण दिले. 'बाप से बेटा सवाई' बनविले. त्यांच्याकडूनच अयोध्येत जाऊन 'रामकथा' गाऊन घेतली. रामाला माहीतही नव्हते ही आपलीच मुले आहेत म्हणून! 
    कोणता प्रसंग आयुष्याचे रुप बदलून टाकेल सांगता येत नाही. लहान मुलांना प्रेरणादायी गोष्टी का बरे सांगण्यात येतात? जिजाबाईने शिवाजी प्रेरणादायी गोष्टींच्या भरवशावरच घडविला. मुलांना इतकी उत्सुकता असते की जीवनाची ओळख त्यांना पालक कोणत्या पध्दतीने करुन देतात यावर त्यांचे पुढचे पाऊल ठरणार असते. चांगल्या-वाईटाचा विधिनिषेध करता येणे आणि सर्व जबाबदाऱ्यांना अटीतटीने सामोरे जाऊन अनेकांचे जीवन सुकर करणे यातच तर 'राम' आहे, 'हनुमान' आहे, 'शिव' आहे. 
'सत्यं, शिवं, सुंदरम्' हेच तर आहे. 
     रामदासांनी हनुमान स्तोत्र किती ओजस्वी, तेजस्वी आणि भारदस्त, योग्य विशेषणे वापरुन केले आहे. 'भीमरुपी महारुद्रा वज्र - हनुमान मारुती 
वनारी अंजनीसुता रामदूता प्रभंजना
महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी दुःखहर्ता धूर्त वैष्णव गायका'
  पूर्ण स्तोत्र देण्याचे प्रयोजन नाही. बहुतेकांना पाठ असते. शाळांमधून पूर्वी शनिवारी हे मारुतिस्तोत्र म्हणवून घेण्याची पध्दत होती. 
    'संस्कार' या शब्दाचा अर्थ संकुचित नाही. जे जे चांगले - अनेकांसाठी हिताचे; मग ते जुने असो की नवीन, त्याचा अंगिकार हाच संस्कार. तो लहान व्यक्तीही मोठ्या माणसावर करु शकतो. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई यांच्यावर संस्कार करणारे कोण होते? आईवडिलांना तर जीवन संपवावे लागले होते; पण सा-या जगावर संस्कार करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. जीवनाच्या शाळेने त्यांना इतके शिकविले की आयुष्याची आसक्ती त्यांना राहिलीच नाही. छोट्याशा आयुष्यात अनेकांना पुरुन उरेल असे साहित्य त्यांनी निर्माण केले. मुक्ताबाईचे 'ताटीचे अभंग' काय सुचवितात! ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर या सर्व भावंडांनीही त्यांचे जीवन संपविले. आयुष्य किती मोठे आहे याला महत्त्व नाही. तुम्ही ते कोणत्या पध्दतीने जगता हे सर्वात महत्वाचे. 
 का बरे रामदासांना 'सावधान' होऊन लग्नमंडपातून पळून जावेसे वाटले? कारण त्यांना 'जीवनाचा राम' खुणावीत होता. जगाचा संसार केला. कुठेही आसक्ती नाही, उलट १३ कोटी जप रामनामाचा, 'श्रीराम जयराम जयजयराम' या त्रयोदशाक्षरी मंत्राचा केला तर राम प्रत्यक्ष दिसतो असे स्वतःच्या अनुभवावरून सांगितले. त्यांचे 'आधी केले मग सांगितले' असे होते. पण आपण नाहीच ना करु शकत! 'आपले मडके कच्चे आहे'. 
  हनुमान व्यायाम शाळा काढल्या जातात. का बरे हनुमानाचे नाव? कारण नावानेच, जे करायचे आहे त्याची कल्पना येऊन जाते म्हणून! 
   रामदासांनी मारुति मंदिरे तयार केली. आजही ती आहेत! मारुतीची उपासना म्हणजे बलाची, शक्तीची उपासना. 'आरोग्य' हा सर्वात मोठा अलंकार आहे. पण ऐकतो कोण? 'हनुमान' चालीसा हाती घेऊन प्रवासातही लोक वाचतात. कारण संकट आले तरी ते निवारण होईल या विश्वासाने!
   'संकटमोचन' असे हनुमानाला म्हंटले जाते. श्रेय आणि प्रेय याचा विचार जो करेल त्याचे जीवन इतरांसाठीही श्रेयस्कर होईल. अर्जुनाच्या रथावर हनुमानाची स्थापना होती. युध्द संपल्यावर हनुमान गुप्त झाला आणि रथ धडधड पेटला अशी कथा आहे. 
   जिथे रामकथा आहे तिथे हनुमान उपस्थित असतोच असतो असा विश्वास आहे. दास्यभक्तीचे त्याच्याशिवाय दुसरे उदाहरण नाही. हनुमान अंगी बाणविणारे आपोआपच विनम्र होतात. कारण जिथे भक्ती आहे तिथे अहंकाराला थारा नाही. 
    विजयाला हनुमानावरच्या लेखाची पुरवणी हवी होती. हनुमानाचे आयुष्य पुरता पुरत नाही व सरता सरत नाही असे आहे. तरी, तिच्या इच्छेसाठी हा लेखनप्रपंच! 

        संगीता पाटखेडकर.
           २०/४/२०१६.

No comments:

Post a Comment