Friday, 4 March 2016

बिना पायलके ही बजे घुंगरु

आकाशगंगेत १० दशलक्ष सूर्य आहेत; पण मानवी डोळ्याने आपण फक्त एकच सूर्य पाहू शकतो. एक सूर्यसुध्दा आपण काही सेकंदापेक्षा अधिक काळ पाहू शकत नाही. एकूण काय मानवी ज्ञानाला मर्यादा आहेत. आयुष्य किती आहे हे कुणीच सांगू शकत नाही, म्हणून जो दिवस वाटणीला आला आहे, तो जास्तीतजास्त चांगल्या पध्दतीने कसा उपयोगात आणायचा याचा विचार प्रत्येकाने आवर्जून करावयास हवा. ज्या कुणाला ज्या गोष्टीची आवड आहे, त्यात जास्तीतजास्त कमालीची प्रविणता मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. ज्ञानाचा हव्यास असावाच. त्यासारखा आनंद नाही. ज्ञान हा धर्म, ज्ञान हेच कर्म, ज्ञान हाच मंत्र आणि ज्ञान हेच तंत्र! ज्ञानी माणूस आपोआपच सर्व दुर्गुणांपासून मुक्त झालेला असतो. 'नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते' हे आध्यात्मिक ज्ञानासंबंधी म्हंटले जाते. ते कोणत्याही भौतिक ज्ञानाविषयीही १००% खरे आहे. कोणतेही काम कमी दर्जाचे नाही हे ज्ञान माणसाला खूप वरच्या श्रेणीला पोहोचविते. अब्राहम लिंकन(अमेरिकेचे अध्यक्ष) चे वडील एक चांभार होते. एका सिनेटरने या कारणावरुन त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते म्हणाले की, 'मी अध्यक्षपदाचे काम तितक्याच उत्तम प्रकारे करु इच्छितो, जसे माझे वडील त्यांचे चांभाराचे काम करीत होते.' भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचे सारथ्य करुन कुठलेही काम कमी दर्जाचे नाही हे दाखवून दिलेच आहे. जगन्नाथपुरीमध्ये राजा स्वतः देवळात झाडू मारण्याचे काम करीत असे. गाडगेबाबा सर्व खेडे साफ करीत. पांडुरंगशास्त्री आठवले सत्संगाच्या आधी सर्व जागा झाडून काढत असत. महात्मा गांधी शौचकूप साफ करीत. बाबा आमट्यांनी महारोग्यांची सेवा केली.
 'वैष्णव जन तो तेणें कहिएँ जो पीड पराई जाणे रे'.
आई, पत्नी, पती, गुरु, डॉक्टर, मालक, नोकर, श्रीमंत गरीब, लहानमोठ्या जाती, प्रत्येकाला एकमेकांची सेवा करण्याची संधी आहे. हाच 'जीवनयज्ञ' आहे. सूर्य, चंद्र, समुद्र, नद्या, पर्वत, वारा, झाडे, प्राणी, हे दुसऱ्याकरताच जगतात असे दिसते. माणसाने निसर्गाचे हे चक्र पाहून जीवनयज्ञकर्म जगायला शिकले पाहिजे.
 गरुड आकाशात उडतो आणि फुलपाखरु पण - आकाश खूप मोठे आहे. कितीतरी पक्षी उडण्याचे स्वातंत्र्य घेऊच शकतात. कुणावर बंधन नाही. महाकाय हत्ती नदीचे पाणी पितात आणि मुंगीही - कारण नदी मोठी आहे, मासे तर पाण्यातच राहतात, पाणी तर सर्वांचेच जीवन आहे.
'मुंगी उडाली आकाशी l तिने गिळिले सूर्यासी' l - असा आध्यात्मिक अनुभव मुक्ताबाई सांगतेच ना! 'पन्नादासी' हे समर्पणाचे महान उदाहरण! स्वतःच्या मुलास राजकुमार उदयसिंहाच्या मुलाशी बदल करते आणि जे शत्रू मारेकरी आले होते त्यांना आपल्या स्वतःच्या मुलास मारु देते पण राजाच्या मुलास वाचविते.
  पावनखिंडीत जीवाची बाजी लावणारा बाजीप्रभू देशपांडे, आग्र्याहून सुटकेच्या वेळी शिवाजीचे रुप घेऊन तिथे कैदेत थांबणारा 'जीवा महाला' मावळा, जौहार करणाऱ्या राजपुतान्यातील स्त्रिया - अशी अनेकानेक त्यागमय आयुष्याची उदाहरणे आपल्याला ठिकठिकाणी आढळतात. चांगल्या वागणुकीसाठी कोणत्याही शिक्षणाची आवश्यकता नाही. माणसाचे मन सात्त्विक गुणांनी शिक्षित असावयास हवे. सत्वगुण त्यागातील आनंद देतो. राजसी गुण दुःख तामसी गुण अंधःकारमय अवस्था! आपण कशाचा अंगिकार करावयाचा हे आपणच ठरवावयास हवे.
  उजाड माळरानावरील तण काढून टाकण्यानेच, खूप मेहनत घेऊन बी-बियाणे पेरुन, खत-पाणी घालून, मळा सजविता येईल ना! बिज अंकुरले, रोपटे वाढले, पाणी सूर्याच्या उष्णतेने फोफावले, आसमंतात डुलू लागले, फळाचा अंकुर दिसला तरच आनंद होईल ना? माती सत्वयुक्त करावयास हवी, बी-बियाणांची माहिती असावयास हवी. एक रोपटे वाढविण्यासाठी जे ज्ञान आवश्यक आहे ते मिळविण्याचे प्रयत्न हवेत. सर्व प्रयत्न सफल झाले, मळा फुलारुन आला की तो आनंद वर्णनातीत होईल ना?
  जंगली झाडेही वाढतात, पण त्यांचा आपण पुरेपूर उपयोग करुन घेऊ शकत नाही. ज्यासाठी मेहनत घेतली, त्याचा अनेकांना आपण उपभोग देऊ शकलो पाहिजे हीच आपली इच्छा असेल ना? आंब्याचे झाड आजोबांनी लावले, पण नातवाला तरी त्याची फळे खायला मिळतीलच ना? कुणीतरी बीज पेरते. पुढच्या पिढ्या उपभोग घेतात हेच जीवन आहे. जीवन अमर आहे हे जाणा, पुढील पिढ्यांसाठी असे जतन करा की संस्कृती उजळून निघेल!
चांगल्या रोपट्याचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

    संगीता पाटखेडकर.

    //२०१६.

No comments:

Post a Comment