Thursday, 31 March 2016

जीवन आणि कला

  जीवन अपरिमेय (अपरिमित) व्यापक, संकीर्ण आहे. थांगपत्ता लावणे कठीण आहे. शोध घेता घेता जन्मानुजन्म अपुरे पडावेत आणि शेवटी काहीच हाती लागले नाही अशी संदिग्धावस्था होऊन जावी इतके ते निःसंदिग्ध आहे; म्हणजे जीवनाची व्याख्या व्याख्येत बसू शकत नाही, जीवनाचे आकलन, आकलनापलीकडचे आहे. जीवनाची ओळख अनोळखी होऊन जावी इतके ते तुम्हाला स्वतःत गुंतवून ठेवून प्रयत्नांची पराकाष्ठा करायला शिकविणारे आहे.
    कितीही अजाणपणे किंवा मानभावीपणाने धुत्कारले तरी जीवनार्थाचे मंथनच कलाकृतीमधून होताना दिसते.
     "Eveyone is alone
   on the heart of the Earth
    pierced by a ray of sun
    and sudden by its evening."
    या तीनच ओळींमध्ये एक इटालियन कवी जीवनाच्या गाभ्यातील प्रकाश-काळोखाची झुंज मुद्रित करतो.
   "शिशिर ऋतुच्या पुनरागमे l एकेक पान गळावया l का लागता मज येतसे, कळे उगाच रडावया l पानात जी निजली इथे l इथली सुकोमल पाखरे l जातील सांग आता कुठे? निष्पर्ण झाडित कापरे" l
  वाङ्मयीन कलाकृतीचे अत्यंत आटोपशीर रुप या भावकवितांतून दिसून येते. मोठा जीवनानुभव अत्यंत मोजक्या शब्दात व्यक्त करण्याचे सामर्थ्य किती सहृदय रीतीने जीवन अभ्यास केला आहे हे दाखवून जातात असे समर्थ कवी!
    कलाकृती आणि मनुष्यजीवन यांना एकमेकांच्या संदर्भात जोखून पाहिल्याशिवाय एकमेकांना अर्थवत्ता येत नाही. अन्वयार्थ, तात्पर्यार्थ, व्यंग्यार्थ, आणि अभिप्रायार्थ यांच्यापलीकडे या सगळ्यांना सामावून घेऊन एक चेतनार्थ, Sense of Consciousness जागा करण्याचे सामर्थ्य रसिकांच्या ठिकाणी निर्माण करणे हे कलाकृतीचे थोरपण असते. अस्तित्वातील चैतन्य प्रत्ययाने समीक्षक - वाचकाला आनंद प्रत्यय देण्याचे सामर्थ्य खरी कलाकृती साधते. ग्रेस यांच्या कविता, दिलीप चित्रे यांच्या कथा, भालचंद्र नेमाडे यांची 'कोसला', पु.शि.रेगे यांची 'सावित्री', खानोलकरांचे 'एक शून्य बाजीराव', यासारख्या साहित्यकृती, जी..कुळकर्णी कमल देसाई यांच्या दीर्घ कथा, हे सर्व साहित्य या चेतनार्थाची संपादणी करतात. कालिदासाचा 'मेघ', उमर खय्यामची 'इरा', गोविंदाग्रजांची 'मुरली', बालकवींचे 'पाखरु', मर्ढेकरांचे पसायदान (भंगु दे काठिन्य माझे) यासारख्या कृती सरलार्थ देता देता चेतनार्थाच्या गाभ्यात आपल्याला नेऊन सोडतात; आणि मगच (त्यांची आकृती कोणतीही असो) त्या आकारसंपन्न असल्याचे आपल्याला जाणवते.
   'एक भव्य मृगावर्त - जग याचे रुढ नाव
   पळते मृग, क्षुब्ध वेड, झपाटणारी धुंद धाव'
 - कृ. . निकुंब.
       हे धुंदत्व सर्वसामान्य माणसांनाच नव्हे तर मोठमोठया बृहस्पतींना आणि पुरुषोत्तमांना भुरळ घालत असते. या क्षुब्ध वेडाच्या आहारी जाणारा ज्ञानदेवांसारखा सतरा कलांचा चंद्र एखादाच!
     "ये पाडसा l ये पाडसा l
स्मृति कालच्या, कृति आजच्या l
पूर्वाह्निके, अपराह्निके l स्वप्ने उद्याची राहू दे l क्षण आतला बघ आरसा l ये पाडसा l     ये पाडसा" l  - कृ. . निकुंब. यांचे 'मृगावर्त' हे खंडकाव्य - जीवनात माणूस आसक्तीत किती डुंबून गेला असतो; पण जीवनानुभव त्याला शेवटी विरक्तीकडे कसा खेचतो याचे वर्णन करणारे आहे.
    अनेक अनुभव, अनंत कलाकृती, अनंत आशा, अनंत अभिव्यक्ती यांना अंतच नाही; त्यामुळे जीवन कला यांनाही अनंतत्वच लाभणार! किती छान! अमर जीवन, अमर कलाकृती, अमर शब्द अमर प्रतिकृति. सर्वच अनंत आणि अमर! किती आनंददायी अनुभव!
जीवनाला कलाकृतींना सामोरे जा! आनंदाला उधाणच उधाण!

           संगीता पाटखेडकर.

           ३०//२०१६.

No comments:

Post a Comment