Wednesday, 2 November 2016

मनसोक्त

    कधी वाटतं काहीच करु नये
    कोणतंच काम करु नये
    कोणतंच मनोरंजन करु नये
   मनाच्या रंजनात रंगवून घ्यावं स्वतःला
   मन नेईल तिकडं न्यावं स्वतःला
  
     कधी वाटतं कुणाचंही ऐकू नये
     ऐकावा फक्त मनाचा कौल
     जावं शरण निसर्गाच्या कुशीत
    गुंग व्हावं बघून नाच मोराचा डौल
      ऐकावी गाणी पक्ष्यांची
     पाहावी घरटी सुगरणीची
     बघावी जोडी गाय वासराची
   
     कधी वाटतं, भरुन घ्यावं मन पिशवीत
     निळं, निरभ्र, रंगीबेरंगी आकाश
      कल्पनेचे पंख लावून मनाला
     हिंडावं, हुंदडावं, बागडावं चहूकडे
      पोहावं स्वच्छंदी होऊन
    दिसता पाणीच पाणी सगळीकडे

  कधी वाटतं, येत नसलं गाता तरीही गावं
     मोठ्याने ओरडावं रानीवनीं
     वृक्षांना साद घालीत राहावं
    फुलांना फुलतांना पाहत बसावं
     प्राण्यांना कुरवाळिता रमावं
  
   कधी वाटतं, खेड्यामधलं घर कौलारु
    बघावं, शेतात जाऊन एखाद्या
    हुर्डा पार्टी करावी, काळ्या मातीत
   पाहून पिकलेले मोती, शेतकऱ्यांचं
      कौतुक करावं
  
   कधी वाटतं, प्रदूषणविरहित सकाळचं
     कोवळं ऊन प्यावं
    कधी वाटतं शहरात फेरफटका
      घालत जावं
   आपल्याच शहराचा हालहवाल बघून
     फिरुन घरी परत यावं

   कधी वाटतं, नात्यांच्या या पडझडीत
  खरं, सच्चं, प्रेम, आपुलकीचं नातं जपावं
   कधी वाटतं, रोजचा कामाचा व्याप
   निरोप देऊ काही काळ, नको हा ताप
  शहरी गोंगाट, कोलाहलात आला कंटाळा
  कधी वाटतं, म्हणूनच, दूर निघून जावं
   जिथे कुणीही आपल्याला ओळखावं
    निसर्ग सहवासात असं कधीतरी
  मनसोक्त जगावं, मनाला वाटेल ते करावं

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

      नोव्हेंबर २०१६.

No comments:

Post a Comment