Wednesday, 16 November 2016

रे मना.....

       रे मना........
      कितीही आले मार्गात काटे
      तरीही चालणं नको सोडू
      कितीही समोर आले खोटेनाटे
      तरीही खरं बोलणं नको सोडू

       कितीही आले दुःख, विघ्न
     दिलखुलास हसणं नको सोडू
     कितीही आले अपयश....
     यशासाठी जिद्द नको सोडू

       कितीही निराशा आली तरी
       आशेचा घेराव नको सोडू
     असभ्यतेच्या काळ्याकभिन्न वेषात
       सभ्यतेचा वेष नको सोडू

       पापी, दुष्ट भावनांच्या गर्तेत
      निष्पाप, निरागसता नको सोडू
       कटू, कडवट, जहरी बोलण्यात
       गोड बोलणे कधी नको सोडू

       असत्य, अन्याय्य, दुराचारात
    सत्यता, न्यायनीतीचे ब्रीद नको सोडू
      असमान, भेदाभेदाच्या दरीत
      समानतेची भर नको सोडू

      अज्ञान, अंधःकाराच्या जाळ्यात
      प्रकाश, ज्ञान विणणे नको सोडू
      कितीही तोडली नाती कुणीही
      जोडणं तू कधीही नको सोडू

     तिरस्कार, अपमान, पराभवात
     प्रेम, मायेने जिंकणं नको सोडू
     निर्दयी, निष्ठूर, जुलुमी वर्तनात
      माणुसकीची साथ नको सोडू

      गरजू, गरीब, दीनदुबळ्यांना
       मदतीचा हात नको सोडू
    अस्वच्छतेच्या गलिच्छ दलदलीत
     स्वच्छतेची वाट नको सोडू

     कितीही झाल्या मरणयातना तरी
     जगण्याची आस नको सोडू
    कितीही झिजला आयुष्यात तरी
     अविरत कष्टांची कास नको सोडू
     रे मना...रे मना...रे मना....
   जे जे चांगलं ते ते काहीही नको सोडू
    .......काहीही नको सोडू.

    मृदुला मुकुंद पाटखेडकर.

       १६ नोव्हेंबर २०१६.

No comments:

Post a Comment