कुणी, कुणाला, केव्हा, कोठे
व कशासाठी हे
सर्वच प्रश्न आध्यात्मिक
क्षेत्रात फार महत्त्वाचे
असतात. 'विष्णूसहस्त्रनाम' या स्तोत्राचे
अवतरण ज्या प्रसंगाने
झाले तो प्रसंग
बघा - भीष्म कुरुक्षेत्राच्या
रणभूमीवर शरशय्येवर आहेत. इच्छामरणी
असल्यामुळे उत्तरायणाची वाट बघत आहेत.
योगबलाने प्राण धरुन ठेवलेले
आहेत. अशा वेळेला
श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की 'भीष्म'
हे आठवा वसू
आहेत. त्यांच्यासारखा धर्मज्ञ,
ज्ञानी, तत्ववेत्ता, भक्त व
पुण्यात्मा पुन्हा होणे नाही.
त्यांच्याबरोबरच त्यांचे सर्व ज्ञान
नाहीसे होऊ नये
म्हणून तू आत्ताच
त्यांची मनधरणी करुन ते
सर्व ऐकून घे!
मग युधिष्ठिर त्यांना
विनंती करतो आणि
भीष्म त्याला हे
स्तोत्र ऐकवितात. या स्तोत्रातील
नामे महाभारत काळातील
आहेत असे नाही.
अनादिकाळापासून ती प्रचलित
आहेत. या नामांवर
अनेक कल्पांपासून ऋषीमुनींनी
तप केलेले आहे.
या नामांमध्ये मंत्रसामर्थ्य
आहे. भीष्मांचे ही
नामे एकत्र गुंफण्याचे कौशल्य जाणवते.
प्रत्येक नाम भगवंताचे
कुठले ना कुठले
वैशिष्ट्य सांगणारे असते. विविध
संदर्भ, विविध सखोल अर्थ
त्या नामाशी निगडीत
असतात.
युधिष्ठिर हा यमपुत्र!
यम ही देवता
व्यक्तीच्या आयुष्याचा न्यायनिवाडा करुन
त्याला सद्गती की दुर्गति
हे ठरविणारी मृत्यूदेवता!
युधिष्ठिराला 'धर्मराज' म्हंटले जाते.
आयुष्यभर 'धर्म' या शब्दाशी
अधिष्ठित व स्थिर
राहिलेला. त्याचे प्रश्न आत्यंतिक
धर्मजिज्ञासेचे व सर्वांसाठीचे!
भीष्म ही व्यक्ती
असाधारण त्याग; व कृष्णालाही
शस्त्र हाती धरायला
लावणारी. 'न धरी
शस्त्र, करी मी'
ही कृष्णप्रतिज्ञा! पण
स्वतःच्या अतुलनीय पराक्रमाने त्यांनी
कौरव-पांडव युध्दात
इतके तेजस्वी रणनीतीचे
सामर्थ्य दाखविले की कृष्णाला
सर्व प्रतिज्ञा बाजूला
सारुन सुदर्शन चक्र
हाती घ्यावे लागले.
भीष्म कृष्णभक्त-विष्णूभक्त
- देवाला स्वतःकडे वळविण्याचे सामर्थ्य
त्यांच्या भक्तीत होते. अशा
या दोन असाधारण
व्यक्तींमधला हा संवाद
म्हणजे 'विष्णूसहस्त्रनाम' स्तोत्र! या स्तोत्राच्या
फलश्रुतीत - स्तोत्राच्या श्रवण-पठनाची वेगवेगळी
'फले' सांगितली आहेत.
ती सर्वच तुम्हाला
मिळतात तेव्हाच, जेव्हा पूर्ण
मनापासून ते स्तोत्र;
तुम्ही अवगत केले
तर! या
स्तोत्रातील प्रत्येक नामाला चतुर्थी
प्रत्यय लावून आरंभी ॐ व
शेवटी नमः म्हंटल्याने
त्यांचे नाममंत्र तयार होतात.
ऐहिक आणि पारमार्थिक
दोन्हीही क्षेत्रात अत्यंत यशस्वी
करणारे हे स्तोत्र
प्रत्येकाने अभ्यासावयास हवे.
संस्कृत येत नाही
म्हणून गडबडून जावयास नको.
अत्यंत चिकित्सा आजकाल करावीच
लागत नाही. इंटरनेटचा
जमाना आहे. सर्व
अर्थ मिळू शकतात.
मुख्य हवी जिज्ञासा!
संस्कृतच्या उच्चारणाने 'शब्दब्रह्म' प्रसन्न
होते. ॐ हा
प्रणव आहे. प्रणव
हा वैराग्याशी निगडित
असून ज्ञान वैराग्याने
स्थिरावते, म्हणून भीष्मांनी विष्णूसहस्त्रनामाची
सुरुवात प्रणवाने केली आहे.
सर्व मंत्र प्रणवातूनच
उद्भवलेले असतात. भगवन्नाम प्रणवरुप
मानून जपले तर
संसारात राहूनही परमार्थ साधला
जातो. ज्ञानेश्वर, त्यांचे
भाऊ व बहीण
हे आध्यात्मिक मार्गातील
उच्चतम आदर्श! सर्वांनाच हे
कसे शक्य? रामकृष्ण
परमहंस सांसारिक होते, एकनाथ
सांसारिक, तुकाराम सांसारिक, पण
पुढे वैराग्यभावना प्रबळ
होऊन, संसारात राहूनही
परमार्थवाटेवर अग्रेसर ठरले. सर्वांना
रामदास किंवा विवेकानंद होणे
शक्य आहे का?
मग आपल्याला झेपेल
एवढे करावे!
'विष्णूसहस्त्रनाम' पाठ आहे,
हे कळल्यानंतर ऐकणारा
विस्मयचकीत होतो, हा माझा
अनुभव आहे. आपल्यालाही
ते असावे असे
वाटणारेही पुष्कळच असतात. अधिकाधिक
मी पाठांतर करावे
असे मला अनेकांनी
नेहमीच सुचविले आहे. त्यात
माझे आई-वडील(प्रमिला मोहरीर व
सदाशिवराव मोहरीर) माझे आजी-आजोबा(आईचे आई
व वडील - सत्यभामाबाई
सास्तीकर व मुरलीधरपंत
सास्तीकर) प्रमोद मोहरीर-(माझा
मोठा भाऊ) या
सर्वांचा समावेश आहे. प्रमोदला
तर खंतही होती
की त्याला इच्छा
असून हे सर्व
पाठांतर करण्यासाठी पुरेसा वेळ
नाही म्हणून! प्रमोद
हा अत्यंत व्यासंगी,
ज्ञानी व अभ्यासू
वृत्तीचा! त्याने सर्व धर्मांचा
अभ्यास केला होता.
त्याची स्मरणशक्ती खूपच प्रभावी
होती.
विष्णूसहस्त्रनामाच्या पारायणाने एक संरक्षक
कवच निर्माण होते
असा अनुभव अनेकांनी
सांगितला आहे. मनःसामर्थ्य
वाढते असा माझा
स्वतःचा अनुभव आहे. घरात
शांति, समाधान निर्माण करण्याचे
सामर्थ्य 'विष्णूसहस्त्रनाम' स्तोत्राच्या लहरीत आहे.
नागपूरच्या दक्षिणामूर्ति मंदिरातील
बाळशास्त्री हरदासांची चातुर्मास्यातील कीर्तने
मला अत्यंत प्रिय
असत. ती ऐकण्यासाठी
मी आमच्या महाल
विभागातील मोहरीरांच्या वाड्यातून भुस्सकन् निघून
जात असे. शांता
मावशी व बाळशास्त्री
हरदास हे माझ्या
मनावर खोलवर संस्कार
करणारे एक आदर्श
जोडपे, मला वाटे.
गोपालकाल्याचे कीर्तन व त्यानंतर
'गोपालकाला' हे सर्वच
प्रेक्षणीय असे. मनाच्या
गाभाऱ्यात खोलवर दडून बसलेल्या,
भक्तीचा संस्कार करणाऱ्या अनेक
आठवणींचा उगम 'दक्षिणामूर्ति
मंदिरात' आहे. ती
वास्तू भलेही नजरेसमोर आज
नाही; पण अंतर्मनाच्या
नजरेत ती नित्यच
आहे. माझ्या सासरचे
लोक, माझे पती
व मुले यांच्यामुळेही
मला सतत भक्तीचा
अनुभव घेता आला
आहे. मला लागणारे
सर्व पूजासाहित्य साग्रसंगीत
रीतीने मुकुंदरावांनी नेहमीच आणून दिले.
अमोलने माझी आवड
ओळखून दुर्गा सहस्त्रनाम,
ललिता सहस्त्रनाम, शिव
सहस्त्रनाम, मला टाईप
करुन पाठविले. निरनिराळे
भक्तीसंगीत मला नेहमीच
ऐकविले. भक्तीची पाळेमुळे तर
आईबाबांमुळे रुजलीच होती. ती
कधीही नष्ट होऊ
नये म्हणूनच की
काय अनेकांचा त्याच्या
संगोपनासाठी खूपच मोठा
हातभार लागला. एम.ए.ला असताना
संतसाहित्याचा पेपर म्हणजे
नुसते परिक्षार्थी वाचन
नव्हते तर खूप
उत्सुकतेपोटी मनःपूर्वक केलेला तो
अभ्यास होता. अशा अनेकानेक
सहस्त्र व्यक्तिमत्चांनी(घर, नातेवाईक,
परिसर, शाळा, कॉलेज, महाविद्यालय,
नोकरीनिमित्ताने संपर्कात आलेले लोक,
लग्नानंतर ओळखीच्या मंडळींचा वाढलेला
आवाका) भक्तीरसाचा पाया मजबूत
केला आहे. श्रीकृष्णाने
गीतेत अर्जुनाला विश्वरुपदर्शन
घडविले. आपल्या संपर्कात येणाऱ्या
व्यक्तींमध्ये भगवंताचा साक्षात्कार घेण्याची
महान किमया अवगत
करणे अशक्य असले
तरी कमीतकमी दोषदुर्लक्ष
करणे तर शक्य
आहे ना! बस्स्
तेवढेच पुरे!
संगीता पाटखेडकर.
२१/२/२०१६.
No comments:
Post a Comment