Sunday, 28 February 2016

सिद्ध कवीची साध्य कविता

शार्दूलविक्रीडित - छंदःशास्त्रातल्या एका वृत्ताचे नाव, याच्या चरणात १९ अक्षरे ,,,,,,, हे गण असतात. शार्दूल म्हणजे वाघ, राक्षस, श्रेष्ठ, असे तीन अर्थ, हे सर्व यासाठी सांगितले की, श्री. अरुण सदाशिव मोहरीर या शास्त्रज्ञ कवीने प्रमोद सदाशिव मोहरीर यांच्या 'कौस्तुभ' नामक पुत्रासाठी जी विवाहप्रित्यर्थ 'मंगलाष्टके' केली आहेत ती कोणताही साहित्य निकष लावला तरी किती 'सर्वार्थ' ठरतात हे सांगण्यासाठी! काव्य करणे हेच मुळात 'प्रतिभा' या अलौकिकतेशी संबंधित. त्यात वृत्तावर पकड ठेवणे खूपच कठीण! वाघ चपळ - क्षणात त्याच्या झेपेचा आवाका नजरेच्या पलीकडे, राक्षस क्रूर पण शक्तिमान, विजयाची उन्मत्तता असणारा. 'श्रेष्ठ' म्हणजे वादच नाही. उच्च पदवीला पोचणारा. अरुणची शब्दार्थ, वृत्त भावपरिपोष यावरची पकड चपळतेलाही लाजविणारी आहे. ज्या ज्या देवतांचा व्यक्तींचा उल्लेख मंगलाष्टकात आला आहे त्या व्यक्ती राक्षसासारख्या क्रूर नसल्या तरी शक्तीमान विजयासाठी नेहमीच उन्मुक्त आहेत. क्रूरता हा बाह्य अभिनिवेश घेता आंतरिक गुण इथे अपेक्षित धरले आहेत; आणि आत्ताच सांगितले की काव्य श्रेष्ठत्वास पोहोचले आहे. का बरे मी इतकी सगळी प्रस्तावना करते आहे - बघु या!
मोरेश्वर मार्तंड मोहरीर, सदाशिव मोरेश्वर मोहरीर, प्रमोद सदाशिव मोहरीर, कौस्तुभ प्रमोद मोहरीर ही नामावली बघा! यातील 'मार्तंड' हे मोहरीर शाखा प्रमुख! त्याआधीचे माहीत नाहीत. मार्तंड हे आमचे पणजोबा. 'मार्तंड' म्हणजे सूर्य. 'वाडा' सूर्यप्रकाशाने उजळून निघत असे हा एक अर्थ मार्तंड पणजोबांच्या दिव्य, तेजस्वी आचरणाने, सर्व वाड्याला स्थिरत्व दिले हा दुसरा अर्थ घेऊ या. सरस्वती, गणपती मोरेश्वर यांचे पूजन नित्य होत असे हा वाच्यार्थ. सरस्वती विद्येची देवता - सर्वांवर सरस्वती प्रसन्न हा अर्थ. बाबा(सदाशिवराव मोहरीर) शिक्षणक्षेत्राला वाहून घेतलेले, मुलांवर शिक्षणाचे संस्कार करणारे - अनेक अर्थ प्रतिमा! गणपती मोरेश्वर दोन्ही एकच - पण वेगवेगळे का लिहिलेश्री गणपतीची पूजा सर्वारंभी ही तर मान्यताच. बाबा अत्यंत धार्मिक वृत्तीचे. 'सुधीर सदाशिवराव मोहरीर' चा जन्म गणेश चतुर्थीचा ही फलश्रुती. पूजापाठ तर घरात असेच असे! 'मोरेश्वर' हे त्यांचे वडील, आई 'राधा'. आईवडिलांची आठवण नेहमीच, त्यांचीही पूजा. आमच्यासारख्यांच्या मनात अनेक संदर्भ दाटून येतात. ही व्यक्तित्वे कुळाला भूषणभूत! अशा कुळात जन्म ही 'प्रस्तावना' अरुणची भावली. 'वाडा' ही वास्तू 'वरदा' या शब्दाने रेखाटली हे खूपच भावले! 'प्रमोद' हे श्रीविष्णूचे नाम, त्याच्या मुलाचे 'कौस्तुभ' होणाऱ्या सुनेचे 'वैजयंती' - किती योगायोग! विष्णूच्या गळ्यातला ताईत म्हणजे कौस्तुभ मणि वैजयंती हार तर विष्णूचे भूषणच. सगळे कसे मंगल जुळून आले असे वाटते की नाही? सदाशिव विष्णूचा जप करतो तर विष्णू सदाशिवाचा असे म्हणतात. हाही अर्थ मी घेते. 'प्रमोद' हे व्यक्तिमत्व आम्हा सर्वांच्या मनात अनेक आठवणींना उजागर करते. वाडा नाही; पण वाडेकरी या लग्नाला नागपुरात सन्मुख होणार! बाबांचे जन्मशताब्दी वर्ष अरुण उत्साहाने साजरे करतो आहे. त्यात या कार्याची भर, नवीन सून घरात येणार याचा आनंद अरुणच्या शब्दातून ओघळतो. बाबा प्रमोदचे डोळे त्याला आकाशात चमकतांनाही दिसतात! भावपूर्णता शब्दांद्वारे साकार करण्याचा प्रयत्न खूपच चांगला! अनुषा- वैशालीची मुलगी, वैशाली, कौस्तुभची बहीण. अनुषा, स्नुषा शब्दप्रयोग लक्षणीय! बाबा प्रमोदसाठी या घटना निश्चितच डोळ्यात सुखाची चमक आणणाऱ्या आहेत. प्रत्येक शब्द त्याद्वारे अर्थाचे संवाहन खूपच वेधक आहे. त्यासर्वांमागील संदर्भ ज्यांना माहीत आहेत त्यांच्यासाठी तर भावनांचा पाझर रोखणे कठीण होते. मंगलाष्टके वाचून अनंत आठवणींनी माझे स्वतःचे डोळे भरभरून वाहिले!  'होळी' म्हणजे वर्ष संपण्याची नांदी. लग्न २० मार्चला आणि होळी २३ मार्चला! गेलेल्या दिवसांची आठवण नेहमी सोबतच असते, पण वसंत ऋतूही मनाला मोहरवतो आणि गुढीपाडवा खुणावतो. वैजयंती नवीन वर्षात(मराठी वर्ष) पदार्पण करणार, चैत्र गुढी या सर्व प्रतिमा अत्यंत समर्पक. काव्याचे लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे एकही संदर्भ कवीने डावलला नाही. मंगलाष्टकांची सिध्दता खूपच सिध्द हस्ते झाली आहे. गतकाळ 'सुवर्णयुग' होता तरी नित्य नवीन दिवसाला सामोरे जाण्याचा संदेश खूप प्रभावी आहे. मंदाकिनी ही स्वर्गंगा आहे. रात्रीच्या वेळी 'मंदाकिनी चंद्रमा' आकाश उजळते. आकाशात ता-यांचे पुंजके मिळून दिसणारी नदीच्या प्रवाहासारखी आकृती म्हणजे आकाशगंगा. सप्तर्षि(मरीचि, अत्रि, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, ऋतु वसिष्ठ) याच नावाचे धृवाजवळचे सात तारे चंद्र, रोहिणी, असे सगळे संदर्भ घेऊन अरुणने, प्रमिला-सदाशिव, प्रमोद-मंदाकिनी असे सर्व एकत्र गुंफून कौस्तुभ आणि वैजयंतीला या नभात झळका असा मंगल आशिर्वाद दिला आहे. 'उंच निळा' म्हणजे आकाश, त्याला अंत नाही, प्रगतीताटाला काठ नाही. रत्नाकरात रत्ने अनंत, क्षीरसागर- ( विष्णू क्षीरसागरी वास्तव्यास). समुद्रमंथनातून, लक्ष्मी-कौस्तुभ निघाले वगैरे प्रतिमा वापरुन त्याने कौस्तुभ-वैजयंतीला हंसासारखा नीरक्षीरविवेक ठेवण्याची केलेली इच्छा, शब्द भाव यांच्या गुंफणीचे कौशल्य पुनःपुन्हा पटविते. 'सर्व विश्वाचे प्रांगण आपलेच आहे, वाड्याचे दार उघडा, तेथील श्वास ऊरी भरुन घ्या, तेथील ऊब अंगिकारा, दिगंती पंख हलवा' - वगैरे वगैरे शब्दसंपदा अनेक अर्थांचे आकाश खुले करते. वाड्याने निर्माण केलेला इतिहास जाणणे, नवागताला माहीत करुन देणे हीही एक मोठी जबाबदारी. एकूण काय अरुणने एका उत्कृष्ट काव्याला जन्म दिला  आहे.

   'मराठी दिनानिमित्त' हाच खास लेख.
   'राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त' 'विज्ञानकवीचे' अभिनंदन.

'गेले ते दिन, ते सुवर्णयुग' ही चित्ती जरी भावना अस्ता जाउनि तोच सूर्य परते पूर्वेस हो नित नवा सूर्याचा उदयास्त रंग उधळे तो एकची तांबडा संध्या आणि उषा दिशा बदलती, कुर्यात सदा मंगलम्.

वरील मंगलाष्टकातील ओळींचे आणखी केलेले स्पष्टीकरण.

गेलेले दिवस 'सुवर्णयुग' होते यात काहीच संशय नाही, अरुणप्रमाणे सर्वांच्याच मनात ती भावना जागृत आहे; याचे कारण गेलेल्या व्यक्तींनी जो कर्तृत्वाचा दिव्य, तेजःपुंज प्रकाश आसमंतात उजळला आणि त्याच्यात आपण सर्वच न्हाऊन निघालो. तसे दिवस पुन्हा येणे नाही हे तर त्रिवार सत्यच, पण दुसऱ्या दिवशीही सूर्य उगवतोच की! अस्तंगत सूर्य नित्य नवीन रुप घेतल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पूर्वेच्या क्षितिजावर दिसतोच. बाबा नाहीत तर अरुण, प्रमोद नाही तर कौस्तुभ, आपापल्या तेजाने तळपतच राहणार! रंगांची उधळण सतत चालूच राहणार. सूर्योदय, सूर्यास्ताचा तांबडा रंग तर तोच राहणार! संध्याकाळ आणि सकाळ यांच्यात फक्त बदल झाला असतो. मंदाची जागा आता वैजयंती घेणार! दिनक्रम चक्रनेमिक्रमाने चालूच राहणार हा आशावाद ठेवून या लग्नाचे स्वागत करावे! म्हणा, 'कुर्यात सदा मंगलम्'. हा अर्थ निघतो असे मला वाटते.
'जेथे नेति नेति श्रुति l
तेथे चले भाषावित्पत्ती l
परब्रह्म आदिअंती l अनुर्वाच्य'

असे रामदास म्हणतात तेच खरे!

       संगीता पाटखेडकर.

        २८//२०१६

No comments:

Post a Comment